उन्हाळा आला की घशाला कोरड पडणे, घामाने हैराण होणं हे सर्व आलंच. त्यामुळे कंटाळून अनेक लोकांचा आहारही कमी होतो. पण, आहारातील खाण्यापिण्याबाबत थोडासा निष्काळजीपणा आणि थेट तुमच्या आरोग्यावर परिणाम, असे चित्र दिसून येते. उन्हाळ्यात उलट्या, जुलाब, अपचन आदी अनेक पोटाच्या समस्या जाणवू लागतात. अशा परिस्थितीत पोट थंड ठेवणे आवश्यक आहे. बहुतांश तरुणमंडळी हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्या खाण्याचा कंटाळा करतात. पण, आपल्या आहारामध्ये पालेभाज्या तसंच फळभाज्यांचा समावेश असावा, कारण या उन्हाळ्याच्या ऋतूत तुमच्या शरीराला थंड ठेवतात.

पालक, मेथी या हिरव्या पालेभाज्या तर आपण खातोच. पण, उन्हाळ्यात कुल्फा म्हणजेच घोळाची भाजीदेखील खाणे आवश्यक आहे. पोषणतज्ज्ञ लीमा महाजन यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या भाजीबद्दल अधिक माहिती दिली आहे. तसेच द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नारायण हॉस्पिटल गुरुग्रामच्या आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे व धर्मशिला नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ पायल शर्मा यांनी या भाजीचे काही आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत.

कुल्फा म्हणजे काय?

तर कुल्फा ज्याला purslane किंवा portulaca oleracea म्हणजेच घोळाची भाजी म्हणूनही ओळखले जाते. ही एक रसाळ पालेदार हिरवी भाजी आहे, जी अनेक भागांमध्ये विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यांत जास्त आढळते. धर्मशिला नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ पायल शर्मा यांनी सांगितले की, ही भाजी अत्यंत पौष्टिक आहे आणि विशेषत: उष्ण हवामानात या रसाळ भाजीचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत.

हेही वाचा…National Dentist’s Day: दातांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर का दिला जातो आईस्क्रीम खाण्याचा सल्ला? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ…

घोळाची भाजी यामध्ये अ, क आणि ई जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारखी आवश्यक खनिजे मुबलक प्रमाणात असतात. त्यामध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिडदेखील असतात, ज्याचा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदा होतो. याव्यतिरिक्त घोळाची भाजीमध्ये कॅलरी कमी आणि आहारातील फायबर जास्त आहे; ज्यामुळे वजन व्यवस्थापन आणि पाचक आरोग्यासाठी ते उत्तम पर्याय ठरते; असे डॉक्टर पायल शर्मा यांचे म्हणणे आहे.

उन्हाळ्यात घोळाची भाजी खाण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीराला हायड्रेट ठेवणे. डॉक्टर शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराबाहेर जो घाम बाहेर पडतो तो भरून काढण्यास मदत होते. शरीर थंड राहते व निर्जलीकरण टाळता येते. याशिवाय घोळाची भाजी उष्माघात आणि घामोळे यासारख्या उष्णतेशी संबंधित आजारांवर एक पारंपरिक उपाय ठरते. म्हणून उन्हाळ्याच्या महिन्यांत घोळाच्या भाजीचा आहारात समावेश केल्यास तुम्हाला हायड्रेशन, आवश्यक पोषक तत्वे आणि उष्ण हवामानात थोडं ताजेतवाने (रिफ्रेश) वाटू शकते, असे डॉक्टर पायल शर्मा म्हणाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुल्फा म्हणजेच घोळाच्या भाजीचे सेवन करण्यापूर्वी त्यावरील घाण अथवा कीड लागलेली पाने काढून टाकून ती पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्या. नारायणा हॉस्पिटल गुरुग्रामच्या आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे यांच्या मते, घोळाची भाजी सॅलेडमध्ये तुम्ही कच्ची खाऊ शकता. तसेच स्टिर-फ्राइज (stir-fries) , सूप किंवा करी यांसारख्या विविध पदार्थांमध्ये ही भाजी घालून तुम्ही याचे सेवन करू शकता. या भाजीची किंचित तिखट चव कोणत्याही पदार्थाला स्वादिष्ट बनवते. त्यामुळे तुम्ही या भाजीचा वेगवेगळ्या पाकृतींसह प्रयोग करून पाहू शकता. घोळाच्या भाजीचा आहारात समावेश केल्याने हृदयाचे आरोग्य, पचन तर एकूणच तुमचे आरोग्य सुधारू शकते; असे डॉक्टर मोहिनी डोंगरे यांचे म्हणणे आहे. तर आपण या लेखातून घोळाची भाजीचा आहारात समावेश करण्याचे फायदे पाहिले.