Mumps Symptoms treatment prevention : केरळमध्ये सध्या गालगुंड या संसर्गजन्य आजाराचा उद्रेक पाहायला मिळतोय. डॉक्टरांकडे रोज या संदर्भातील रुग्ण उपचारांसाठी येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये केरळमध्ये गालगुंडाची लागण झालेले शेकडोहून अधिक रुग्ण आढळून आले, त्यामुळे तेथील नागरिकांच्या मनात या आजाराविषयी भीती निर्माण होत आहे. डॉक्टरांकडून अनेक रुग्ण गालगुंड आजाराविषयी आणि त्यांनी कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे, यासंदर्भात चौकशी करत आहेत. याच विषयावर आता नवी दिल्लीतील साकेतमधील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे इंटरनल मेडिकल डायरेक्टर डॉ. रोमेल टिकू यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

गालगुंड संसर्गजन्य आजार आहे, जो पॅरामिक्झो विषाणूमुळे होतो. दरवर्षी याचे अनेक रुग्ण आढळून येतात. त्याचे परिणाम व्यक्तीसापेक्ष असतात, तो MMR (गालगुंड, गोवर, रुबेला) लसीने सहज प्रतिबंध केला जाऊ शकतो. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येते. त्यामागचे एकमेव कारण म्हणजे मोठ्या संख्येने मुलांचे नियमित लसीकरण झालेले नाही किंवा कमी लसीकरण झाले आहे, पण यामुळे कालांतराने व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी होते, ज्यामुळे धोका वाढतो. पण कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा आजार होऊ शकतो.

लक्षणे काय आहेत?

इतर संसर्गजन्य आजाराप्रमाणेच गालगुंड आजाराची सुरुवात होते. यात सुरुवातीला ताप, अस्वस्थता, शरीरदुखी, स्नायू दुखणे, भूक न लागणे आणि उदासीनपणा येतो. लक्षणे प्रकट होण्याआधी विषाणू दोन आठवडे किंवा त्याआधीच शरारीत प्रवेश करतो, यामुळे लक्षण वेगाने विकसित होऊ लागतात. पॅरोटीड ग्रंथींच्या जळजळीमुळे कानाभोवती आणि तुमच्या जबड्याच्या बाजूला तीव्र वेदना होतात. या वेदना कमी होण्यासाठी सुमारे ७ ते १४ दिवस लागतात. एखादा कडक पदार्थ खाताना याची तीव्रता जाणवते. अशावेळी जबड्यात दुखत असल्याने तुम्ही अन्न चावून खाऊ शकत नाही.

हा संसर्गजन्य आजार आहे का?

गालगुंडचे विषाणू श्वसनमार्गात विकसित होतात, जे नंतर संक्रमित व्यक्तीच्या लाळ किंवा श्वसनाच्या थेंबातून थेट दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित करतात. त्यामुळे इतर लोकांमध्ये हा विषाणू पसरू नये म्हणून ग्रस्त रुग्णाने स्वतःला सर्वांपासून दूर ठेवा. स्वच्छता राखा आणि वारंवार हात धुवा. शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल घ्या. डोअर नॉब, बाथरूमचा नळ आणि काउंटर यांसारख्या वस्तूंचे नेहमी निर्जंतुकीकरण करा. तसेच अन्न किंवा इतर वस्तू एकमेकांना वापरण्यास देणे टाळा.

कोणत्या प्रकारच्या चाचण्या केल्या जातात?

लक्षणे दिसू लागल्यानंतर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त, लाळ किंवा जी सांगतील ती चाचणी करून घ्या, कारण या चाचणीमुळे संसर्ग कधी झाला, त्यावर लवकरात लवकर काय उपाय करता येतील हे समजते.

गालगुंडांवर उपाय

लहान मुलांना गालगुंडपासून वाचण्यासाठी MMR Vaccine दिले जाते, पण मोठ्यांना सहसा अँटीव्हायरल आणि वेदनाषमक औषधं दिली जातात, तीही मर्यादित असतात. या आजाराविरोधात लढण्यासाठी विश्रांती आणि हायड्रेशन असणे आवश्यक आहे.

या आजाराचे गंभीर परिणाम होऊ शकतात?

फार क्वचितच. पण हा आजार लाळग्रंथीवर परिणाम करतो ज्यामुळे गालांना सूज आणि तीव्र वेदना होतात. संसर्ग झालेल्यांपैकी काहींना याचा जास्त त्रास होऊ शकतो. किशोरवयीन मुलांना त्यांच्या अंडकोषात वेदना किंवा सूज येऊ शकते तर किशोरवयीन मुलींना त्यांच्या स्तन आणि अंडाशयांमध्ये वेदना किंवा सूज येऊ शकते. काही जण ब्राँकायटिसची तक्रार करू शकतात. एकूणच मेंदूपासून पायापर्यंत वेदना जाणवतात, ज्यामुळे मेंदूवर आणि अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. सर्वात गंभीर म्हणजे मेंदूची जळजळ जाणवू शकते, ज्याला एंसेफलायटिस असे म्हणतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही लस कधी घेतली पाहिजे आणि ती किती काळ टिकते?

गंभीर संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात MMR लसीचे दोन डोस हवे आहेत. जर तुम्ही लहानपणी गालगुंड, गोवर आणि रुबेलाची लस घेतली असेल तर तुम्हाला त्यांच्याविरुद्ध आजीवन प्रतिकारशक्ती मिळते, त्यामुळे काळजी करण्याची गरज नसते. ज्या लोकांनी बालपणात संसर्ग झाला नसतानाही MMR लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना गालगुंड होण्याची शक्यता लस न घेतलेल्या लोकांपेक्षा नऊ पट कमी असते. सामान्यतः MMR लसीचा पहिला डोस मूल १२ ते १५ महिन्यांचे असताना आणि दुसरा डोस चार ते सहा वर्षांच्यादरम्यान दिला जातो.