कॉमेडियन भारती सिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या कामामुळे चर्चेत येते, पण यावेळी ती आरोग्यामुळे चर्चेत आली आहे. भारती कधी तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबाबत तर कधी आई म्हणून तिचे अनुभव सांगते. नुकतीच ती थायलंडवरून परत आली, पण त्यानंतर तिला बरं वाटत नव्हते. अलीकडेच तिच्या ब्लॉगमध्ये खुलासा करत तिने सांगितले की, “थायलंडहून परत आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मला बरे वाटत नाहीये, मला खूप सुस्तावल्यासारखे आणि थकवा आल्यासारखे वाटत आहे. चिंता करण्यासारखे काही नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही आता फक्त रक्त तपासणी करत आहोत. या सगळ्यामुळे मला खूप भीती वाटते. हर्षने (पती हर्ष लिंबाचिया) कोणालातरी रक्त तपासणीसाठी बोलावले आहे.

वैद्यकीय चाचण्यांबद्दल तिला भीती वाटते हे मान्य करत तिने सांगितले की, आजकाल आरोग्य समस्यांमध्ये वाढ होत असताना प्रतिबंधात्मक तपासणी करण्याला मी प्राधान्य दिले.

लाफ्टर शेफ्स २ च्या होस्ट असलेल्या भारतीला असा प्रश्न पडला की, “हा त्रास तिला खूप जास्त श्रम(दगदग) केल्यामुळे होत आहे का? तिने असेही म्हटले की, “ती अशक्तपणामुळे उभी राहू शकत नाही.”

“रक्त तपासणीमुळे मी सकाळपासून रडत आहे, पण ते करणे महत्त्वाचे होते. लवकरच माझी पूर्ण शारीरिक तपासणीदेखील होणार आहे, पण मला सिरिंजची खूप भीती वाटते. आजकाल दर सहा महिन्यांनी तुमचे आरोग्य तपासणे खूप महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला सर्वांना तुमची जीवनशैली सुधारण्याचा आग्रह करते. मी स्वतःवरही काम करत आहे,” असेही भारती या व्हिडीओमध्ये म्हणाली.

स्वतःच आजाराचे निदान करू नये किंवा स्वतः औषधोपचार घेऊ नये, कारण ते धोकादायक असू शकते.

प्रवासानंतर आपण आजारी का पडतो? तज्ज्ञांनी केला खुलासा

द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना मुंबईच्या परळ येथील ग्लेनीगल्स हॉस्पिटलमध्ये इंटरनल मेडिसिनच्या वरिष्ठ सल्लागार असलेल्या डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, “व्यावसायिक कामाच्या सहलींनंतरचा कालावधी काहींसाठी त्रासदायक असू शकतो,” हे सांगतानाच प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे यावर त्यांनी सहमती दर्शवली.

“काही जण प्रवास केल्यानंतर आणि घरी परतल्यानंतर आजारी पडू शकतात. थकवा येण्याबरोबर ताप येणे हे विविध कारणांमुळे असू शकते. विषाणूजन्य संसर्ग, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड किंवा प्रवासादरम्यान झालेल्या साध्या फ्लूमुळे ताप येऊ शकतो. प्रवास करताना शरीर वेगवेगळ्या हवामान, अन्न आणि संसर्गांच्या संपर्कात येते, ज्यामुळे आजार होऊ शकतो,” असे डॉ. अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

तापाचे नेमके कारण ओळखण्यासाठी प्राथमिक चाचण्या आवश्यक

“जर सलग दोन दिवस ताप असेल तर डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे. तापाचे नेमके कारण ओळखण्यासाठी डॉक्टर आवश्यक चाचण्या सुचवतील. रक्त चाचण्या, शारीरिक तपासणी आणि प्रवासाचा इतिहास हे ताप विषाणूजन्य किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे आहे की इतर कारणामुळे झाला आहे हे ठरवण्यास मदत करतात. तुम्हाला डॉक्टर जे सांगतात तेच करावे लागेल,” असे डॉ. अग्रवाल सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“उपचार निदानावर अवलंबून असतील, म्हणून जर तुम्हाला विषाणूजन्य तापाचे निदान झाले तर फक्त विश्रांती घ्या, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषध घ्या. मलेरिया किंवा टायफॉइडमुळे होणाऱ्या तापासाठी वैयक्तिक उपचार आणि औषधे आवश्यक आहेत. भरपूर पाणी पित राहा, हलके जेवण घ्या आणि बरे होण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या. प्रवासादरम्यान योग्य खबरदारी घेतल्यास आजारी पडण्याचा धोका कमी होऊ शकतो आणि प्रवासानंतर आजारी पडणार नाही,” असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.