Virat Kohli’s Fitness : कधी कधी आपण अशा गोष्टी करतो, ज्या आपल्या लिस्टमध्ये कधीच नव्हत्या. एकदा विराट कोहलीबरोबर असेच घडले, ज्यामुळे तो त्याच्या फिटनेसविषयी सीरियस झाला. २०१८ मध्ये अभिनेता आमिर खान, अपारशक्ती खुराना यांच्याबरोबर संवाद साधताना दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने कबूल केले होते की, २०१२ पर्यंत त्याची शरीररचना (shape) खूप वाईट होती.
कोहली सांगतो, “२०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आम्ही परत आलो आणि आशिया कपसाठी बांगलादेशला गेलो तेव्हा पाकिस्तानबरोबरच्या एका सामन्यात मी सर्वोच्च एकदिवसीय १८३ धावा काढल्या होत्या. तो काळ चांगला होता. म्हणून मला वाटले की, जर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली, तर मला आयपीएलमध्येसुद्धा चांगली कामगिरी करीत वर्चस्व गाजवावे लागले; पण हा एक खेळ आहे. येथे तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही. मला अनेकदा अपयश आले. पहिल्या सहा-सात सामन्यांमध्ये मी धावा करू शकलो नाही. मी क्वचितच दोन आकडे रन काढू शकलो. मानसिकदृष्ट्या मी पूर्णपणे खचलो. मी त्यावेळी माझ्या आहार आणि ट्रेनिंगविषयी इतका सीरियस नव्हतो.”
“मला ट्रेनिंग कशी घ्यायची हेसुद्धा कळत नव्हते. मला वाटले की, प्रॅक्टिस पुरेशी आहे. त्याशिवाय मला जिममध्ये काय करायचे, किती धावायचे, शरीराचे वजन, फॅट्स किती टक्के काहीही माहिती नव्हते. मी खूप गोड खायचो. हॉटेल रूममध्ये मिनी बारमध्ये असलेले ४० टॉफीची दोन पाकिटे एका आठवड्यात संपवायचो. मला खाण्यापिण्याची पद्धत माहीत नव्हती. आयपीएलमधून बाहेर पडणे माझ्यासाठी खूप कठीण होते. मी घरी गेलो”, असे विराटने पुढे सांगितले.
पुढे विराट सांगतो, “मी अंघोळ करून बाहेर आलो आणि आरशात स्वत:ला पाहिले, तेव्हा मलाच माझी लाज वाटली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटर असताना एखादी व्यक्ती अशी कशी दिसू शकते? तो दिवस होता टर्निंग पॉइंट. दुसऱ्या दिवसापासून मी सर्व काही पूर्णपणे थांबवले आणि माझा पूर्ण डाएट प्लॅन बदलला. मी दररोज दोन तास जिममध्ये वर्कआउट करू लागलो.”
पहिले सहा महिने आव्हानात्मक होते हे सांगताना विराट सांगतो, “सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. पण, एकदा हे सर्व अमलात आणले की, ते सुरळीत पार पडते.”
याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मानसोपचार तज्ज्ञ, लाइफ कोच डेलना राजेश सांगतात, “हे सोपे वाटेल; पण ही मानसिकता तुमचे आयुष्य बदलू शकते. जेव्हा तुम्हाला कळते की, तुम्ही आता सहन करू शकणार नाही, तेव्हा बदल दिसायला सुरुवात होते.”
त्या सांगतात की, स्वत:शी पूर्णपणे प्रामाणिक राहणे अधिक फायदेशीर ठरते. “तुम्ही कोणत्या गोष्टी स्वत:वर काम करण्याला नाही म्हणता हे तुम्ही कोणत्या गोष्टीला हो म्हणता, यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमची मूल्ये, ऊर्जा आणि वाढ यांच्याशी कोणत्या गोष्टी जुळत नाहीत, याविषयी तुमच्यामध्ये स्पष्टता येते, तेव्हा तुम्हाला नेमके काय करायचे, हे कळते” असे डेलना यांनी अधिक स्पष्ट करताना सांगितले.
त्यामुळे जर तुम्हाला अडकलेले, हरवलेले वाटत असेल, तर “मी काय करायला पाहिजे”, असे विचारू नका.
त्याऐवजी विचारा,
“मी काय करत आहे?”,
“मी कोणत्या गोष्टीसाठी मागे हटण्यास तयार नाही?”
“शेवटी मी काय मिळवण्यास तयार आहे?”
“स्पष्टपणा म्हणजे तुम्ही भविष्यावर नियंत्रण मिळवणे नव्हे. हे तुम्ही स्वत:चे किती ऐकता, यावर अवलंबून आहे आणि एकदा तुम्ही हे केले की, तुम्ही धैर्याने त्याचे अनुकरण करता. ज्या क्षणी तुम्ही जे तुम्ही नाहीत, त्याला नाही म्हणता, त्यावेळी तुम्ही जे आहात, त्यासाठी जागा तयार करता”, असे डेलना अधिकत्वाने विशद करून सांगतात.