आजकाल धावपळीच्या जीवनात महिलांना घर-कुटुंब अशा गोष्टी सांभाळून नोकरी करावी लागते. रोजच्या तारेवरच्या कसरतीमुळे महिलांची अक्षरश: दमछाक होते. ज्यामुळे अनेक महिला तणावाखाली असतात, कामाचे टेन्शन, यात कुटुंबाचं टेन्शन; ज्यामुळे महिलांना अस्वस्थ वाटू लागते, ज्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसून येतो. यात महिलांच्या पोटावर, चेहऱ्यावर अतिरिक्त चरबी वाढू लागते. अशावेळी ही अतिरिक्त चरबी फास्ट फूड किंवा व्यायाम न केल्याने वाढते असे महिलांना वाटू लागतेय. अशा परिस्थितीत त्या वाढती चरबी कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुमच्या चेहऱ्यावर आणि पोटावर अचानक चरबी का वाढू लागली, यामागे कोणते कारण, आजार तर नाही ना? याच विषयावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना बेंगळुरूमधील स्पर्श हॉस्पिटलचे सल्लागार, एंडोक्राइनोलॉजी आणि ह्यूमन मेटाबॉलिजम डॉ. प्रवीण रामचंद्र यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

या विषयावर आधी वेट गेन ट्रेनर आणि कोलेजन एक्स्पर्ट रिचा राठोड म्हणाल्या की, जर तुम्ही लठ्ठपणाने ग्रस्त आहात, यात तुमच्या पोटावर अतिरिक्त चरबी वाढत असेल, चेहरा गोल गोल दिसत असेल, दररोज डुलकी घेण्याची गरज भासत असेल, रात्रभर झोप लागत नसेल, पहाटे २-३ च्या दरम्यान जाग येत असेल आणि साखर आणि कार्बोहाइड्रेटयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर हे हाय कोर्टिसोलमुळे होत आहे. यामुळे शरीरात कोर्टिसोल या होर्मोन्सची पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते, ज्यामुळे तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवता येते.

तणावाच्या वेळी महिलांच्या शरीरात कोर्टिसोल हा हार्मोन्स सोडला जातो. कोर्टिसोलची उच्च आणि कमी पातळी दोन्ही अनेक आरोग्य समस्यांना आमंत्रण देतात. पण, कोर्टिसॉल हे आपल्या शरीराच्या कार्यासाठी, चयापचय क्रिया, रोगप्रतिकारक शक्ती आणि तणाव नियमन यासाठी महत्त्वाचे असते. रक्तदाब, रक्तातील साखर नियंत्रित करण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते. कोर्टिसोलची पातळी उच्च असल्यास पोटावर चरबी जमा होऊ लागते, जे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

जेव्हा आपण तणावाखाली असतो, तेव्हा ॲड्रेनल ग्रंथींद्वारे कोर्टिसोल तयार होते, यावेळी शरीरात तात्काळ उर्जेसाठी रक्तातील साखरेची पातळी आणखी वाढवते, मेंदूकडून ग्लुकोजचा वापर वाढवतो. या क्रिया तणावाच्या स्थितीत शरीरासाठी फायदेशीर असल्या तरी सतत तणावामुळे दीर्घकाळापर्यंत कोर्टिसॉल सोडले जाते, ज्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असे डॉ. प्रवीण रामचंद्र म्हणाले.

डॉ. रामचंद्र यांच्या मते, सततच्या तणावामुळे कोर्टिसोलची पातळी वाढते. या उच्च पातळीमुळे पोटावरील चरबीही वाढू लागते.

कोर्टिसोल वाढत्या पातळीमुळे स्नायूंच्या ऊतींचे विघटन होण्यास सुरुवात होत. यावेळी शरीर ऊर्जा मिळण्यासाठी अमिनो ॲसिड सोडत असते, ज्यामुळे स्नायूंचे कार्य आणि चयापचय क्रियेत बाधा येते, परिणामी वजन वाढू लागते. याचा दुसरा परिणाम म्हणजे केवळ पोटावरील चरबीच नाही तर चेहऱ्याच्या त्वचेवरही अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते, असे डॉ. रामचंद्र म्हणाले.

कोर्टिसोलची उच्च पातळी हानिकारक का आहे?

शरीरातील कोर्टिसोलच्या उच्च पातळीमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या, इन्सुलिन प्रतिरोधक चयापचय सिंड्रोम, टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो, रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते, हाडांची झिज होते. ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो, त्यामुळे चिंता, नैराश्य अशा मानसिक आरोग्याच्या समस्यादेखील उद्भवू शकतात, असेही डॉ. रामचंद्र यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा परिस्थितीत जीवनशैलीत काही चांगले बदल करणे आवश्यक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. यासाठी रोज ताजे अन्न खाणे, तणावाचे व्यवस्थापन करणे, ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ व्यायाम करणे, अल्कोहोल किंवा कॅफिन पिणे टाळणे, तसेच कोर्टिसोलचे व्यवस्थापन करण्यासाठी झोपेचे चांगले वेळापत्रक राखणे आवश्यक आहे.