भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी रिलायन्स जिओचे मे २०२१ मध्ये आणखी तब्बल ३५.५ लाख युझर्स जोडले आहेत. तर याच कालावधीत त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या घटली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मे महिन्याचा स्बस्क्रायबर डेटा जारी केला. ज्यानुसार एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने मे २०२१ मध्ये ४० लाखांहून अधिक ग्राहक गमावले तर जिओ या एकमेव टेलिकॉम कंपनीने ३५.५ लाख युजर्स कमावले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने जारी केलेल्या डेटानुसार, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी असलेल्या भारती एअरटेलने (Bharti Airtel) या काळात आपले तब्बल ४३.१६ लाख युझर्स गमावले आहेत. तर व्होडाफोन आयडियाने ४२.८ लाख वापरकर्ते गमावले आहेत. जून २०२० नंतर भारती एअरटेलचे ग्राहक कमी होण्याची ही अगदी पहिलीच वेळ आहे.

वायरलेस युजर्स मार्केटमध्ये Airtel चं वर्चस्व कायम

ट्रायच्या (TRAI) आकडेवारीनुसार, वायरलेस युजर्सच्या मार्केटमध्ये रिलायन्स जिओचा वाटा ३६.६४ टक्के होता. तर एअरटेलचे २९.६० टक्के आणि व्होडाफोन आयडिया २३.५९ टक्के आणि बीएसएनएलचे ९.८९ टक्के होते. दरम्यान, एअरटेलकडे अद्यापही वायरलेस यूजर्सचं कमाल प्रमाण ९७.९९ टक्के इतकं आहे. तर एमटीएनएलच्या वायरलेस युजर्सची संख्या सर्वात कमी नोंदवली गेली आहे.

Airtel, Vi च्या प्रीपेड-पोस्टपेड प्लॅन्समध्ये सुधारणा

अलीकडेच, टेलिकॉम ऑपरेटर कंपनी भारती एअरटेलने २८ जुलै रोजी आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये सुधारणा आणि आपल्या एंट्री-लेव्हल प्लॅनच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली. यावेळी कंपनीने ४९ रुपयांचा एंट्री-लेव्हल प्रीपेड प्लॅन देखील बंद केले आहेत. त्यामुळे आता एअरटेलला सर्वात स्वस्त एंट्री-लेव्हल प्रीपेड पॅक ७९ रुपयांपासून सुरू होतील. दरम्यान, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानेही आपल्या पोस्टपेड प्लॅन्समध्ये सुधारणा केली आहे. मात्र, यावेळी वाढलेल्या किंमतींचीच जास्त चर्चा झाली.