अनेकदा घरी केलेला स्वयंपाक दिवसभरात संपत नाही किंवा बाहेरून मागवलेले पदार्थ कमी पडू नये म्हणून थोडे जास्त प्रमाणात आणले जातात. तेव्हा आपल्याला हवे तेवढे खाऊन झाल्यानंतर उरलेल्या पदार्थांना डब्यांमध्ये भरून आपण फ्रीजमध्ये ठेऊन देतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना मस्त गरम करून खायला घेतो. पण, पुन्हा गरम केलेल्या त्या शिळ्या पदार्थांची चव अधिकच चांगली लागते; असे तुमच्यासोबत कधी झाले आहे का?
तेव्हा शिळ्या पदार्थाची चव उतरण्यापेक्षा तो अजूनच स्वादिष्ट कसा बरं लागू शकतो असा तुम्हाला प्रश्न पडला असेल; तर त्याचे उत्तर इथे आहे. असे होण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. त्यात नेमके काय म्हटले आहे ते पाहा.
शिळे अन्नपदार्थ अधिक चविष्ट लागण्याची चार कारणे :
१. रासायनिक प्रक्रिया
एखादा अन्नपदार्थ बनवल्यानंतरही त्यामध्ये रासायनिक प्रक्रिया होत असतात, अशी माहिती अमेरिकेची इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी देत असल्याचे एनडीटीव्हीच्या एका लेखात सांगितले आहे. त्यानुसार अन्नपदार्थांमध्ये घडणाऱ्या प्रक्रियेमुळे काही घटकांची चव अधिक वाढण्यास मदत होते, म्हणून शिळे अन्नपदार्थ ताज्या पदार्थांपेक्षा अधिक चविष्ट लागतात.
हेही वाचा : साध्या ‘राजमा चावल’साठी भरावे लागले ‘इतके’ रुपये! विमानतळावर अन्नाच्या नावाखाली होत आहे लूट? पाहा
२. पदार्थ जितके शिळे तितके स्वादिष्ट
तुम्ही अन्नपदार्थ मंद आचेवर शिजवले, तर त्याची चव मोठ्या आचेवर शिजवलेल्या पदार्थांच्या चवीपेक्षा अधिक वेगळी लागते, हे तुम्हाला माहीतच असेल. मात्र, असे का होते? तर याचे कारण असे की, तुम्ही पदार्थ बनवण्यासाठी जितका जास्त वेळ घ्याल, तितकाच तो पदार्थ शिजत असताना त्यामधील सर्व घटक व्यवस्थित शिजले जाऊन त्याची चव वाढण्यास मदत होते. अगदी याच प्रकारे शिळ्या पदार्थांचे असते. एखादा पदार्थ अधिक काळ साठवून ठेवल्यानंतर पदार्थात त्याची चव मुरते, म्हणून आपल्याला तो ताज्या बनवलेल्या गोष्टींपेक्षा अधिक आवडतो.
३. पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे
तयार झालेल्या खाद्यपदार्थात होत असलेल्या रासायनिक प्रक्रियांमुळेच खरंतर पदार्थ खराब होत असतात. मात्र, आपण वेळीच त्यांना फ्रीजमध्ये ठेवल्याने, फ्रीजच्या त्या गार हवेत पदार्थ खराब होण्याची गती, रासायनिक प्रक्रिया मंदावते. त्यामुळे पदार्थ लवकर खराब न होता या उलट त्यांची चव वाढत असते. असे तुम्हाला साधारण ग्रेव्ही किंवा डाळ यांसारख्या पदार्थांमध्ये अधिक घडताना दिसू शकते. लसूण, कांदा हे घटक पदार्थांमधील प्रथिने आणि स्टार्च यांच्यासोबत शिजत असताना जशी प्रक्रिया करत असतात, तसेच फ्रीजमध्ये असतानादेखील करत असते, अशी माहिती फोर्ब्सच्या एका लेखातून समजते. त्यामुळे शिळ्या पदार्थांमध्ये कांदा-लसूण यांची चव अधिक वर येते, असे तुम्ही कधी लक्ष दिले असेल तर समजेल.
४. आपल्या जिभेला शिळ्या पदार्थांची चव आवडत असते.
जेव्हा पदार्थ गरम असतो, ताजा असतो तेव्हा आपण त्यामध्ये असणारे विविध घटक अगदी सहज ओळखू शकतो. कोणत्या पदार्थात आलं आहे, कशात वेलची घातली गेली आहे ते जीभ अगदी सहज ओळखते. मात्र, हा अनुभव जिभेसाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो, अशी माहिती एनडीटीव्हीच्या एका लेखातून समजते. परंतु, शिळ्या पदार्थांमध्ये सर्व घटक व्यवस्थित मुरलेले असतात. परिणामी, त्या मुरलेल्या चवीमुळे जिभेला शिळे अन्नपदार्थ अधिक पसंत पडतात.
हेही वाचा : पाठीवर गोंडस कुत्रा अन स्केटिंग करत तरुण चढतोय घाट! सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा!
शिळे पदार्थ खाताना काळजी घ्या
जरी आपल्याला शिळ्या पदार्थांची चव आवडत असेल, तरीही त्याने तुम्हाला किंवा तुमच्या पोटाला काही त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तयार पदार्थ जास्तीतजास्त तीन ते चार दिवसांपर्यंत फ्रीजमध्ये ठेऊन चालतात. काही पदार्थ तीन ते चार महिन्यांसाठी फ्रीजरमध्ये गोठवले जाऊ शकतात, अशी माहिती अमेरिकेच्या कृषी विभागाने [Department of Agriculture (USDA)] दिल्याचे एनडीटीव्हीच्या एका लेखातून समजते.