कव्हरस्टोरी
जगाच्या एका कोपऱ्यात काही देशांपुरता मर्यादित असलेला डेंग्यू दुसऱ्या महायुद्धानंतर बराच पसरला. जागतिकीकरणानंतर तर त्याने सगळ्या आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्या आहेत. वेगाने होणारं शहरीकरण त्याच्या फारच पथ्यावर पडलं आहे. या इवल्याशा डासाशी लढण्यासाठी सगळ्या मानवजातीलाच अत्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे.
‘दिल्लीत डेंग्यूने ओलांडला चार हजारांचा आकडा’,  ‘मुंबईत डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ’, ‘डेंग्यूने घेतला डॉक्टरचाच बळी’, ‘नागपुरात पसरतेय डेंग्यूचे साम्राज्य’ अशा हेिडगच्या बातम्या वेगवेगळ्या वृत्तपत्रातून आणि न्यूज चॅनेलवरून नियमितपणे प्रसारित होतायेत. मोदी, नीतिशकुमार आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्यांनी देशभरात ‘इलेक्शन फिवर’ संचारत असतानादेखील माध्यमे व्यापण्याच्या बाबतीत डेंग्यूने या साऱ्यांना मागे टाकलेले दिसते. या साऱ्या पाश्र्वभूमीवर डेंग्यूचे आहे ते चार विषाणू कमी होते म्हणून की काय डेंग्यूचा नवीन विषाणू सापडल्याचा दावा नुकताच काही शास्त्रज्ञांनी केला आहे. बँकॉकमध्ये झालेल्या डेंग्यूसंदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये या स्वरूपाचा शोधनिबंध सादर करण्यात आला, ज्याला अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी अनुमोदन दिले आहे. ‘साला एक मच्छर..!’, हा नानाचा एकेकाळचा गाजलेला डायलॉग शब्दश: खरा असल्याची प्रचीती हा सामान्य मच्छर तुम्हाला-मला रोज देतो आहे. या डेंग्यूचं करायचं काय, हा प्रश्न स्थानिक पातळीपासून जागतिक पातळीवर सर्वासमोर आ वासून उभा राहिला आहे.

‘साला एक मच्छर..!’, हा नानाचा एकेकाळचा गाजलेला डायलॉग शब्दश: खरा असल्याची प्रचीती हा सामान्य मच्छर तुम्हाला-मला रोज देतो आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात डेंग्यू आजाराचे प्रमाण आणि भौगोलिक विस्तार वेगाने वाढताना दिसतो आहे. १९५० च्या पूर्वी हा आजार मुख्यत्वे उष्ण कटिबंधातील मोजक्या देशांमध्ये आढळत होता. मुळात शहरीकरणाचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याने त्याचे प्रमाण लक्षणीय नव्हते. आणि त्या काळी आंतरराष्ट्रीय वाहतूकही बहुतांशी सागरी मार्गाने होत असल्याने या आजाराचा भौगोलिक प्रसार होण्यास बऱ्याच मर्यादा होत्या. मात्र दुसरे महायुद्ध या विषाणूच्या आणि त्याचे वहन करणाऱ्या एडीस डासाच्या पथ्यावर पडले. या महायुद्धात आशिया-पॅसिफिक खंडात आलेले जपानी आणि इतर राष्ट्रांच्या सन्यातील हजारो सनिक डेंग्यूने आजारी पडले आणि ते आपापल्या देशात परतले तेव्हा त्यांच्या खांद्यावरील बंदुकीसोबतच स्वत:च्याच लोकांविरुद्ध लढणारे घातक हत्यार त्यांच्या रक्तात ते वाहून नेत होते याची त्यांना कल्पनाही नव्हती. हे हत्यार होते-डेंग्यूचा विषाणू..! आणि सन्यदलाच्या अनेक छोटय़ामोठय़ा कंटेनर्समधून इवलासा, काळपट पण अंगापायावर पांढरे पट्टे असणारा आणि ज्याची स्वत:ची धाव पन्नास मीटरपेक्षा जास्त नाही असा एडीस डासही सुहास्यवदने प्रवास करत होता. आणि या साऱ्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. १९५० ते १९७० या काळात डेंग्यूचे मोठे उद्रेक फिलिपाइन्स, थायलंड, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, व्हिएतनाम या देशांत झाले. १९५० नंतर आíथक प्रगतीलाही वेग आला होता आणि १९९० नंतरच्या जागतिकीकरणाच्या चरमसीमेनंतर तर या इवल्याशा विषाणूने साऱ्या आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्या. जगातल्या एका कोपऱ्यातला हा आजार आज सुमारे सव्वाशे देशांत पसरला आहे. जगातील जवळपास साडेतीन अब्ज लोकसंख्या या आजाराच्या छायेत राहते आहे. दरवर्षी सुमारे २० कोटी रुग्ण, पाच लाख गंभीर गुंतागुंती आणि वीस हजार मृत्यू असे भयप्रद जागतिक रेकॉर्ड या डेंग्यू विषाणूच्या नावावर आहे. डयुआन गुबलर हे डेंग्यू आजाराचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मानले जातात. ‘ट्रॉपिकल मेडिसिन अ‍ॅण्ड हेल्थ’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या एका लेखाचे शीर्षक मोठे बोलके आहे- ‘डेंग्यू, अर्बनायझेशन अँड ग्लोबलायझेशन- द अनहोली ट्रिनिटी ऑफ द ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी.’ –  अर्थात या एकविसाव्या शतकाचे त्रिदेव आहेत – डेंग्यू, शहरीकरण आणि जागतिकीकरण..!  शहरीकरण आणि जागतिकीकरणाच्या युतीतूनच डेंग्यूचे विश्वव्यापी आव्हान आज आपल्यासमोर उभे ठाकले आहे.


आज महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाले तर आपली जवळपास पन्नास टक्के लोकसंख्या शहरात राहते. वेगाने होणारे बेसुमार आणि अनियंत्रित शहरीकरण यामुळे नव्याने वाढणाऱ्या शहरी भागामध्ये पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा आणि सार्वजनिक आरोग्याच्या नव्या नव्या समस्या उत्पन्न होताना आपण पाहतो आहोत. निमशहरी भागात अपुऱ्या मूलभूत सोयींमुळे, पाणीटंचाईमुळे पाणी साठवून ठेवण्याकडे लोकांचा कल वाढतो आणि त्यातूनच डेंग्यूच्या डासाला वाढण्यासाठी उत्तम कुरण मिळते. त्यामुळेच डेंग्यूकडे मुख्यत्वे शहरी आजार म्हणून पाहिले जाते. अर्थात म्हणून तो ग्रामीण भागात बिलकुल आढळतच नाही अशातला भाग नाही. जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक मागील पन्नास वर्र्षांत कैक पटीने वाढली आहे, या साऱ्यामुळे डेंग्यूचा विषाणू आणि एडीस डास पूर्वीच्या डेंग्यूमुक्त भागामध्ये सुखनव पसरतो आहे, जग जिंकण्याची ईष्र्या बाळगणाऱ्या अलेक्झांडरसारखा डेंग्यू रोज नवे नवे प्रांत आपल्या अधिपत्याखाली आणतो आहे. २००८ मध्ये ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरोमध्ये डेंग्यूचा एवढा प्रचंड प्रकोप झाला की सरकारला सन्याची मदत घ्यावी लागली. जवळपास तशीच परिस्थिती दोन वर्षांपूर्वी लाहोरमध्ये निर्माण झाली. २०११ या एका वर्षांत लाहोरमध्ये डेंग्यूचे एकवीस हजारांहून अधिक रुग्ण आढळले तर चक्क ३५० मृत्यू.! आपल्या सो कॉल्ड विकासाच्या नशेत, ग्लोबल तंद्रीत जर आपण असेच आंधळ्यासारखे चालत राहिलो तर हे घडणार, पुन्हा पुन्हा घडणार.!

दरवर्षी सुमारे २० कोटी रुग्ण, पाच लाख गंभीर गुंतागुंती आणि वीस हजार मृत्यू असे भयप्रद जागतिक रेकॉर्ड या डेंग्यू विषाणूच्या नावावर आहे. शहरीकरण आणि जागतिकीकरणाच्या युतीतूनच डेंग्यूचे विश्वव्यापी आव्हान आज आपल्यासमोर उभे ठाकले आहे.

डेंग्यूचा हा अश्वमेध कोणी आणि कसा रोखायचा हा कळीचा मुद्दा आहे. डेंग्यूचा हा अश्वमेधाचा घोडा रोखायला कोणी अवतार पुरुष येणार नाही, की केवळ एखाद्या जादुई लसीने डेंग्यूसारख्या अनेक विषाणूंमुळे निर्माण झालेले आव्हान एका रात्रीत संपणार नाही. आपल्यालाच आपला सामूहिक पराक्रम जागवावा लागेल, तरच आपण हे आव्हान पेलू शकू. कारण आपल्या ग्लोबल गावाच्या विकासाने वरवर चाललेला तापमानाचा काटादेखील आता डेंग्यूच्या बाजूने झुकला आहे. क्लायमेट चेंजमुळे पृथ्वीचे तापमान वाढते आहे आणि त्याचा अनुकूल परिणाम डासांच्या आणि विषाणूच्या वाढीवर होतो आहे. नव्या वातावरणात डास ‘अंडी ते प्रौढ डास’ हे आपले जीवनचक्र अधिक लवकर पूर्ण करताना दिसत आहेत.


डेंग्यूचा डास म्हणजे एडीस एजिप्ती किंवा अल्बोपिक्टस हा एक छोटासा कीटक. त्याच्या अंगापायावर असलेल्या पांढऱ्या पट्टय़ांमुळे तो सहज ओळखू येतो. या पांढऱ्या पट्टय़ांमुळेच त्याला टायगर मॉस्कीटो असे नामाभिधान प्राप्त झाले आहे. याचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे हा सर्वसाधारणपणे दिवसा चावतो. या डासाच्या मादीला आपली अंडी उबविण्यासाठी मानवी रक्ताची गरज असते आणि म्हणून ती चावते. असे चावतानाच ती एका डेंग्यूबाधित रुग्णाच्या शरीरातील विषाणू दुसऱ्या निरोगी माणसाकडे पोहचविते आणि डेंग्यूचा प्रसार सुरू राहतो आणि आजच्या जेट युगात इतक्या वेगाने आणि इतक्या नव्या नव्या भागात की ज्या युरोपमध्ये १९२६ पासून एकही डेंग्यू उद्रेक आढळला नव्हता तिथेही म्हणजे फ्रान्स, पोर्तुगालसारख्या देशांमध्ये मागील काही वर्षांमध्ये डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत.

डेंग्यूचा हा अश्वमेधाचा घोडा रोखायला कोणी अवतार पुरुष येणार नाही, की केवळ एखाद्या जादुई लसीने डेंग्यूचे आव्हान एका रात्रीत संपणार नाही.

डेंग्यूचे चार प्रकारचे विषाणू आहेत. तीव्र ताप, सांधेदुखी, स्नायुदुखी, डोळ्यांमागे वेदना होणे, उलटय़ा होणे, पोटात दुखणे, रक्तस्राव ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. रक्तस्रावी डेंग्यू ही जिवावर बेतणारी बाब आहे. शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण कमी झाल्याने रक्तस्रावाची संभावना वाढते आणि काही वेळा रुग्ण दगावतोही. डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असते, ही त्यातील सर्वात काळजी करावी अशी गोष्ट.! भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे वाढला असला तरी डेंग्यू समाजवादी आहे, तो साऱ्यांना समान लेखतो आणि म्हणून तो निमशहरी झोपडपट्टी भागात जसा आढळतो तसाच उच्चभ्रू वस्तीत देखील आढळतो. २००६ च्या दिल्ली उद्रेकात पंतप्रधानांच्या नातवांनादेखील डेंग्यू झाला होता आणि गेल्या वर्षी मुंबईत ‘जब तक है जान’ निर्माण करणाऱ्या यश चोप्रा यांचे निधनही डेंग्यूनेच झाले.

डेंग्यू नियंत्रणाचे केवळ तीनच उपाय आपल्या हातात आहेत आणि ते म्हणजे प्रभावी डास नियंत्रण, अधिक प्रभावी डास नियंत्रण आणि अत्याधिक प्रभावी डास नियंत्रण..!!!

डेंग्यूच्या या समतावादी वर्तनाचे कारण त्याच्या उत्पत्तीस्थानात दडले आहे. डेंग्यूचा एडीस डास मुख्यत्वे घरगुती पाणीसाठय़ात वाढणारा डास आहे. जे पाणीसाठे उघडे आहेत अशा साठय़ात, कुंडय़ा, फुलदाण्या, कारंजी, कुलरचे ट्रे, पक्ष्यांना/प्राण्यांना पाणी पिण्यासाठी केलेल्या खोलगट जागा अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यात या डासाची वाढ होते. याशिवाय खराब टायर्स, नारळाच्या करवंटय़ा, इतस्तत: पडलेले प्लास्टिकचे डबे, बाटल्या, पिशव्या छतावर ठेवलेल्या वस्तू, अंथरलेले प्लास्टिक, झाडांचे खोलगट बुंधे, रांजण अशा एक ना अनेक ठिकाणी एडीस जन्माला येतो. अगदी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीच्या उपडय़ा पडलेल्या टोपणात साचलेले पाणी जरी त्याला सात-आठ दिवसांकरिता मिळाले तरी त्यात एडीस बाळाचा जन्म होतो.

आता अशा बहुप्रसव डेंग्यू डासाचा लगाम खेचायचा कसा? डेंग्यूवर कोणतेही औषध आजमितीला उपलब्ध नाही. लस निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण.. त्यालाही वेळ आहे. त्यामुळे डेंग्यू नियंत्रणाचे केवळ तीनच उपाय आपल्या हातात आहेत आणि ते म्हणजे प्रभावी डास नियंत्रण, अधिक प्रभावी डास नियंत्रण आणि अत्याधिक प्रभावी डास नियंत्रण..!!! एकात्मिक कीटक व्यवस्थापन असा एक किचकट शब्दप्रयोग यासाठी वापरला जातो. हे प्रभावी डास नियंत्रण करण्यासाठी आपल्या सर्वाच्या सहभागाची आत्यंतिक आवश्यकता आहे. भाई, सिर्फ सरकार यहां कुछ नहीं कर सकती. आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाकणे, आपल्या घरात किंवा अवतीभवती नळगळती असू नये, घरातील फुलदाण्यातील पाणी दिवसाआड बदलणे किंवा कुंडय़ांत डास अळीनाशक ग्रॅन्युल्स टाकणे, बििल्डगवरील पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाकलेल्या असणे, खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसविणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, अवतीभोवती/ घराच्या छतावर प्लास्टिकच्या वस्तू, इतर खोलगट वस्तू असतील त्या नष्ट करणे अथवा नष्ट करणे शक्य नसेल तर त्यात पाणी साठणार नाही अशा पद्धतीने ठेवणे, खराब टायर्समध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे, या व अशासारख्या गोष्टी आपण साऱ्यांनी करणे, नियमितपणे करणे आवश्यक आहे. आपल्या घरात, घराभोवती एडीसचे बारसे घातले जाणार नाही याची काळजी आपण डोळ्यात तेल घालून घेतली पाहिजे. कारण एडीसचे बारसे म्हणजे आपले मरण हे विसरता कामा नये. विशेषत: सुट्टीवर जाताना कमोड झाकून ठेवणे, पाण्याची भांडी मोकळी करून पालथी घालून ठेवणे, नळ ठिबकून अनावश्यक पाणी साचणार नाही याची काळजी घेणेही आवश्यक आहे.
शहरी भागात साप्ताहिक स्वरूपात अळीनाशकाचा वापर, गप्पीमाशांचा वापर आणि नागरिक – विकासक यांच्यासाठी डासोत्पत्ती प्रतिबंधक सिविक बायलॉजचा वापर या शासकीय पातळीवरील बाबीदेखील प्रभावी डास नियंत्रणासाठी अत्यावश्यक आहेत. शहरीकरण आणि जागतिकीकरणाचा गाडा आता कोणीही परत फिरवू शकणार नाही आणि ते योग्यही ठरणार नाही. मात्र या अभद्र त्रयीतील डेंग्यूचा बिमोड करणे मात्र आपल्या हातात आहे आणि त्यासाठी आपण सर्वानी आपली काठी डेंग्यूमुक्तीच्या गोवर्धनाला लावली पाहिजे. अन्यथा डयुआन गुबलर यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘वुई डोन्ट डू एनीथिंग अनटील देअर इज क्रायसिस अँड देन वुई ट्राय टू रिअ‍ॅक्ट टू रीच टू इट अँड इट्स ऑलवेज टू लिट्ल, टू लेट,’’ अशी आपली गत होऊ नये.