|| सॅबी परेरा
प्रिय मित्र दादू यास..
सदू धांदरफळेचा नमस्कार!
तुमच्या गावाकडे निवडणुकीचे ताबूत निवले असले तरी आमच्या इथे मुंबईत उद्या निवडणूक असल्याने अजून हवा तापलेलीच आहे. निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून बरेच समाजकार्यकर्ते (म्हणजे तेच- स्वत:च्या घरी नकोसे झालेले, नसत्या उठाठेवी करणारे टगे लोक रे!) चारचौघांत, नाक्यावर, ट्रेनमध्ये आपल्याच कुटुंबीयांना शिव्या देताना दिसू लागले आहेत. खोलात गेल्यावर कळलं की अप्पा, नाना, भाऊ, दादा हे कोणी कुटुंबीय वा नातेवाईक नाहीत, तर ज्यांच्यासाठी मागच्या निवडणुकीत आपण जिवाचे रान केले, ज्यांच्यासाठी आपल्याच नातेवाईकांबरोबर, मित्रांबरोबर झगडलो आणि आता जे आपल्याला फाटय़ावर मारून दुसऱ्याच पक्षात गेले आहेत, असे हे नेते! किंवा मागच्या निवडणुकीत विरोधी पक्षातल्या ज्या- ज्या नेत्याच्या आईबहिणीचा आपण उद्धार केला, त्यालाच आता आपला नेता म्हणून डोक्यावर घेऊन नाचावं लागतंय, या उद्वेगातून आलेल्या या प्रतिक्रिया आहेत.
काहीही म्हण दादू, पण हा निवडणुकीचा माहोल मला खूप आवडतो. पाच वर्षांत जे कधी आपल्याला दर्शनही देत नाहीत, मात्र निवडणुकीच्या वेळी जिवाभावाचे दोस्त वाटावेत असा जिवंत अभिनय करणारे नेते आणि नेते होऊ इच्छिणारे अभिनेते आपल्या गरिबांच्या दारासमोर येतात, अगदी कमरेतून वाकून नमस्कार करतात, आपल्याला ‘साहेब’ बोलतात, आपण काहीही अद्वातद्वा बोललो तरी हसतमुखाने ऐकून घेतात. अशाने नाही म्हटलं तरी आपला अहं सुखावतोच. (आणि मग ट्रेनमध्ये, ऑफिसमध्ये ‘अस्सा सुनावला त्याला..’ अशी फुशारकी मारायला बरं पडतं!) रोज होणाऱ्या नाक्यांवरील प्रचारसभा, शोभायात्रा, टीव्हीवरील चर्चा, वर्तमानपत्रांतील ठिकठिकाणच्या बातम्या, आरोप-प्रत्यारोप, आश्वासने, उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी उघड केलेली एकमेकांची लफडी-कुलंगडी, फुकट मिळणारे टीशर्ट, टोप्या, दारू-बिर्याणीच्या पाटर्य़ा या सगळ्या फुल्टूफटाक मनोरंजनाला आपण परवापासून मुकणार आहोत, या विचारानेच माझी पुणेरी (म्हणजे रविवार दुपारी १ ते ४) झोप उडाली आहे.
दादू, तुमच्या मतदारसंघात एका फ्लायओव्हरसम्राट राष्ट्रीय नेत्याने हवेत उडणारी डबल डेकर बस सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे पेपरात वाचले. गंमत वाटली रे. म्हणून मी म्हणतो, निवडणूक प्रचाराचे दिवस म्हणजे अक्षरश: उडवाउडवीचे दिवस. कोण कधी काय उडवील, हे सांगता येत नाही. स्वबळाच्या बेटक्या फुगविणारे कार्यकारी संपादक भुवया उडवतात. मी म्हणजेच पक्ष म्हणणारे राजे कॉलर उडवतात. पिस्तूलधारी मंत्री गाडय़ा उडवतात. विजनवासात गेलेले माजी मंत्री रोज नव्या रेवडय़ा उडवतात. कुणी बोलताना थुंकी उडवतात. सगळेच आश्वासनाचे पतंग उडवतात. सत्तेत असताना कमिशन उडवणारेही भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर इतरांच्या टोप्या उडवतात. शेवटी नाइलाजानं युती करावी लागणारच आहे, हे माहीत असूनही कुणी स्वबळाच्या अफवा उडवतात. दिल्लीहून राज्यात आल्यापासून जत्रेत हरवल्यागत वागणारे जाकीटधारी बाबा केसाचा तुरा उडवतात. एखादा आदर्श नेता सैनिकांचा हक्कच उडवतो. पार्लमेंटला कविसंमेलन समजणारे कविराज बारोमाही हवेत उडत असतात. स्वत:ला नव्या युगाचे गांधी समजणारे उपोषणसम्राट गांधीगिरीवरचा विश्वास उडवतात. निवडणुकीपासून दूर असलेला एखादा पुतण्या सत्ताधाऱ्यांची झोप उडवतो, तर दुसरा एखादा पुतण्या दुष्काळातही धार उडवतो. एखाद्याच्या भाषणाची हुर्यो उडवणे, मुद्दामहून सोशल मीडियामार्फत बऱ्यावाईट अफवा उडवणे, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते उडवणे आणि विरोधी उमेदवारांवर- विशेषत: स्त्रियांवर बदनामीचा चिखल उडवणे हे तर नेहमीचेच. दादू, तुला सांगतो, हे सगळं काही मला पटतं अशातला भाग नाही; पण आपल्या मध्यमवर्गीय निरस आयुष्यात घटका- दोन घटका हा उडवाउडवीचा आनंद फुलवणारे निवडणुकीचे दिवस मी मनापासून एन्जॉय करतो.
दादू, काल एक गंमतच झाली. एका जुन्या मित्राशी असंच बोलत असताना ‘टीव्हीवरील राजकीय चर्चाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चाललाय. चर्चा करायला बोलावलेले मान्यवर एकमेकांविषयी अतिशय गलिच्छ भाषा वापरतात. हे उद्वेगजनक आहे..’ या विधानावर आम्हा दोघांचंही एकमत झालं आणि मग या चर्चाचा दर्जा सत्ताधारी पक्षाच्या अंध भक्तांमुळे जास्त घसरलाय की विरोधकांच्या पाळीव कुत्र्यांमुळे- या विषयावर आमच्या दोघांत असे काही आरोप-प्रत्यारोप झाले, की मग आम्हीही टीव्हीवरील राजकीय चर्चाच्या पातळीवर येऊन एकमेकांची आयमाय उद्धारून चर्चेला पूर्णविराम दिला!
निवडणुकीच्या प्रचारसभा सुरू झाल्यापासून चला हवा येऊ द्या, कॉमेडीची बुलेट ट्रेन, कपिल शर्मा शो अशा सगळ्या हाहाकारी कार्यक्रमांचा टीआरपी पार गाळात गेलाय म्हणे. परवा आमच्याकडे एका उमेदवाराची प्रचारसभा होती. भाषणाच्या ओघात तो म्हणाला की, ‘‘आनंदी माणसांच्या निकषात भारत ११३ व्या क्रमांकावर घसरला असून ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि राज्यातील जनतेला सुखी, आनंदी, सुरक्षित करण्याबरोबरच त्यांच्यात सकारात्मकता वाढीस लागण्यासाठी मी बांधील आहे. आमचे सरकार आल्यास आम्ही ‘आनंद मंत्रालय’ (हॅपिनेस मिनिस्ट्री) स्थापन करण्याचा विचार करीत आहोत.’’ मी मनातल्या मनात म्हणालो, उगाचच खर्च करायची गरज नाहीये भावी मंत्री- महोदय. तुम्ही फक्त आमच्या गाडय़ांना लागणारं पेट्रोल, डिझेल आणि हॅप्पी अवर्समध्ये माणसांना लागणाऱ्या इंधनावरील टॅक्स कमी करा; मग आनंद मंत्रालय असलं काय आणि नसलं काय, सगळीकडे आनंदाचे डोही आनंद तरंग! खरंय की नाही?
दादू, हल्ली एक नवीन ट्रेंड आलाय. मतदान केल्यावर शाई लावलेलं आपलं बोट दिसेल अशी सेल्फी घेऊन तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा. हे बघ, म्हणजे आपण जागरूक नागरिक असणं, मतदान करणं ही चांगलीच गोष्ट आहे. पण कधी कधी मला असं वाटतं, की रजा घेऊन, पायपीट करून, रांगेत उन्हातान्हात उभं राहून मतदान करणाऱ्या आपल्यासारख्या वेडय़ा नागरिकांपेक्षा मतदान न करणारी शहाणी माणसंच अयोग्य उमेदवार निवडून देतात. आपण सगळे या गैरसमजात असतो, की मतदान हा लोकशाहीने आपल्याला दिलेला मोठ्ठा अधिकार आहे आणि मतदान करून आपल्याला व्यवस्था बदलता येते. पण तू मला सांग, जर मतदान करून व्यवस्था बदलता आली असती तर या प्रचलित व्यवस्थेनं आपल्याला मतदान करू दिलं असतं काय?
मित्रा, हा निवडणुकांचा, प्रचाराचा हँगओव्हर उतरला की माझं डोकं वेगळ्याच गिअरमध्ये चालू लागतं. मी विचार करतो की, आपली लोकशाही म्हणजे तरी नक्की काय आहे? ज्या व्यवस्थेत जनतेला मतदान करून आपल्याला हवा तसा पाच वर्षांसाठी हुकूमशहा निवडता येतो, तिलाच लोकशाही म्हणायचं काय? अरे दादू, मला निवडणुकीचा माहोल आवडतो हे खरंय; पण केवळ निवडणुकीचा माहोल एन्जॉय करण्यासाठी इतका खर्च, इतका तामझाम करून पुन्हा तेच जुनं सरकार निवडून देणं म्हणजे डिंकाचे वा मेथीचे लाडू खावेसे वाटले म्हणून बाळंत होण्यासारखं आहे.
निवडणुकीच्या काळातील सगळ्यात जास्त गैरप्रकार निवडणुकीच्या पूर्वरात्री होतात हे उघड गुपित असल्याने ‘रात्र वैऱ्याची आहे’ असं म्हणण्याचा प्रघातच पडून गेला आहे. पण दादू, तू मला सांग, राणाभीमदेवी थाटात शक्य-अशक्य अशा सर्व प्रकारची आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्यांना आपणच वाऱ्यावर सोडलेल्या आश्वासनांचा प्रतिध्वनी कधी ऐकू येत नसेल काय? आपल्या राजकीय फायद्यासाठी हिंसाचार आणि युद्धखोरीला उत्तेजन देणाऱ्यांना निरपराध नागरिकांच्या आणि सैनिकांच्या आयाबहिणींचा टाहो ऐकू येत नसेल का? जनतेने खुर्चीवरून खाली खेचूनही ज्यांची गुर्मी अजून उतरली नाही अशा विरोधीपक्षीयांना पाच वर्षांपूर्वी मतपेटीने कानाखाली काढलेला आवाज अजूनही ऐकू आला नसेल काय? केलेल्या कामाचे एकाचे दहा सांगताना, न केलेल्या कामाचे अन् फसलेल्या योजनांचे खापर दुसऱ्यावर फोडताना, बापजन्मात शक्य होणार नाहीत अशी अवाजवी आश्वासने देताना नेतेमंडळींना आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकू येत नसेल काय? निवडणुकीची प्रक्रिया पार पडायच्या आधीपासूनच प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार नाक्यानाक्यांवर, सोशल मीडियावर आपणच कसे जिंकणार आणि बाकीच्यांचं डिपॉझिट कसं जप्त होणार याचे ढोल बडवतात. ते पाहून असे वाटते की, गेली पाच वर्षे यांचे कान तर दडलेलेच होते; पण मागील महिना-दीड महिना जनतेमध्ये फिरून, उरल्यासुरल्या निष्पक्ष मीडियामधून आणि चोवीस तास ऑनलाइन असूनसुद्धा यांना जनतेचा आवाज ऐकूच आला नसेल काय? त्यामुळेच दादू, मी या निष्कर्षांप्रत आलोय, की रात्र वैऱ्याची असेल किंवा नसेलही, पण दिवस नक्कीच बहिऱ्यांचे आहेत!
तुझा राजकीय मूकबधिर मित्र..
सदू धांदरफळे
sabypereira@gmail.com