प्रा. मीनल येवले

रश्मी पदवाड मदनकर लिखित ‘पद्मकोश’ कादंबरी अलीकडेच प्रकाशित झाली. ही कादंबरी आपल्याशी पत्रसंवाद साधते. पद्मकोशची नायिका एका दुर्धर आजाराने ग्रस्त असून तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांच्या माध्यमातून तर्काधिष्ठित निष्कर्ष काढून ते समाजाच्या हिताच्या दृष्टीने पत्ररूपी संवादातून लेखिकेने आपल्यापर्यंत पोचवले आहे. ही कादंबरी प्रातिनिधिक आहे हे मी अशासाठी म्हणते की, अशा समांतर जगण्याचे प्राक्तन लाभलेल्या माणसांना त्यांच्या जगण्याचा, त्यांच्यासोबत घडलेल्या सुखदु:खाच्या घटनांचा अर्थ लावता येत नाही. त्यांना त्यांच्या जगण्याचा संघर्ष मोठा वाटतो, पण त्या संघर्षांच्या माध्यमातूनही जगण्याचं सोनं करता येतं हे कधी गवसतच नाही. मग आलेल्या संकटांनी अनेक जण पोळली जातात, कोणी हात टेकतात, कोणी पळ काढतात. अशाच माणसांना नवसंजीवन देणारं हे पुस्तक आहे.

हेही वाचा : मायक्रोवेव्ह उपग्रहांची किमया…

एखाद्याच्या वाटय़ाला आलेला भोगवटा एखादा लेखक इतक्या उत्कटतेने लिहितो की तो तेवढय़ाच प्रखरपणे वाचकांच्या मनापर्यंत जाऊन कसा पोहोचतो हे या कादंबरीतून जाणवते. प्रतिकूल परिस्थितीसह कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करीत अगदी काही मोजके दिवस वाटय़ाला असताना येणाऱ्या प्रत्येक क्षणाला जगून घेण्यासाठी धडपडणाऱ्या नायिकेच्या जीवन संघर्षांची कहाणी ‘पद्मकोश’मध्ये अतिशय ताकदीने साकारली गेली आहे. दुसऱ्याचं दु:ख, वेदना, यातना स्वत:च्या जिवावर ओढून घेत त्या समर्थपणे मांडणं फार अवघड असतं. हे मांडताना कुठेही शब्दांचं अवडंबर नाही की अवजड भाषा अलंकारिक शब्दाचा मोह नाही.

हेही वाचा : लाल सिंहातल्या दिवाळी शिखर परिषदेचा वृत्तांत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत पोहोचलेल्या संवेदनांना तितक्याच प्रांजळपणाने शब्द देणाऱ्या लेखिकेचे मनापासून कौतुक. कादंबरीच्या रूढ रचनाबंधाला छेद देत नायिका पद्माच्या पत्रापासून सुरू होणाऱ्या कादंबरीचा शेवट लेखिका रश्मीच्या पत्राने होतो. केवळ दु:ख उगाळत बसल्याने समस्या सुटत नाहीत. कितीही संकटे आली तरी येणाऱ्या क्षणात सकारात्मकता शोधत ज्याचे त्यालाच जगणे सुसह्य करता येते. आयुष्याच्या प्रवाहात हार मानलेल्यांनी, समस्यांना चिकटून नाउमेद झालेल्यांनी, व्याधींनी त्रस्त होत मानसिक बळ खचलेल्यांनी ही कादंबरी नक्की वाचावी.
‘पद्मकोश’, रश्मी पदवाड-मदनकर, इंक एन पेन पब्लिकेशन, पाने-२००, किंमत-२९५