डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो 

विविध गटांतल्या बालकांसाठी आणि किशोरांसाठी, रंजक गोष्टींमधून काही शैक्षणिक संकल्पना स्पष्ट करणारी आणि वैज्ञानिक संदेशही देणारी पुस्तके वर्षां गजेंद्रगडकर यांनी लिहिली आहेत. पुण्याच्या राजहंस प्रकाशनाने त्यांच्या दहा पुस्तकांचा संच प्रकाशित केला आहे. या सचित्र पुस्तकांचा स्पर्शच अत्यंत हवाहवासा आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

तीन ते सहा या वयोगटासाठीच्या ‘वाघोबाचा पत्ता’ या चित्तवेधक पुस्तकात वेगवेगळय़ा पशू-पक्ष्यांचे अधिवास कोठे असतात, हे सांगितले आहे. वाघोबासह पोपट, नागोबा, कासव, करकोचा, वानर, मगर, हरीण, ससा, फुलपाखरे, पांढरे अस्वल, गांडूळ आणि अगदी मुंगीसारखे लहान सजीवही आपापल्या निवाऱ्याच्या ठिकाणी सुखाने नांदत असतात. या साऱ्यांचे पत्ते सुबोध, सुलभ भाषेत दिल्यामुळे आपल्यालाही सहज सापडतात. हे पत्ते कळल्यामुळे त्या त्या प्राण्यांचे निवारे वाचवणे म्हणजेच निसर्ग वाचवणे, निसर्गावर प्रेम करणे ही आपली जबाबदारी आहे, हा संदेशही चिमुकल्यांना मिळतो. या वयोगटातली मुले स्वत: वाचू शकत नसली तरी पालक आणि शिक्षकांनी मुलांपर्यंत हा आशय पोहोचवावा अशी अपेक्षा आहे.

‘नागोबाचं वेटोळं’ हे सात ते नऊ या वयोगटातल्या मुलांना आकार आणि रेषांची ओळख करून देणारे पुस्तक आहे. वर्तुळ, चौकोन, लंबगोल, वेटोळे असे आकार आणि आडव्या, उभ्या, तिरप्या, नागमोडी अशा रेषा आपल्या अवतीभवती कुठे कुठे दिसतात, हे या पुस्तकात सांगितले आहे. चांदोबा आणि चेंडू, तोंडलं आणि अंडं, होडी आणि कलिंगडाची फोड, नागोबाचं वेटोळं आणि चकली, पेरु आणि शंख, तारेवर रांगेत बसलेल्या चिमण्या आणि मुंग्यांची रांग, नारळ आणि सुरुची लंबूटांग झाडे, रस्ता आणि वळणे घेत जाणारी नदी अशा अनेक गोष्टींच्या आकारांमधले साम्य चित्रांच्या मदतीने आणि सोप्या शब्दात मुलांपुढे ठेवले आहे. पुस्तकाच्या शेवटी आकार आणि रेषा ओळखण्याकरता स्वयंअध्ययन म्हणून एक लहानसा उपक्रमही दिला आहे. मुलांच्या निरीक्षणशक्तीला आणि कल्पनाशक्तीला वाव देणारे हे पुस्तक आहे.

घरकामांत मदत करून आणि अनेक लहान लहान गोष्टी शिकून सुटीचा दिवस कसा घालवता येतो, हे सांगणारे ‘रोहनचा रविवार’हे पुस्तक स्त्री-पुरुषांमधल्या श्रमविभागणीच्या पारंपरिक संकल्पनेला छेद देऊन, ‘घरातली सगळी कामे कुटुंबातल्या सदस्यांनी मिळून करायची असतात,’असा आजच्या काळात आवश्यक असणारा महत्त्वाचा संदेश देते. घरातल्या माणसांचा एकमेकांशी असणारा संवाद आणि एकमेकांना केली जाणारी मदत घरातले वातावरण खेळीमेळीचे ठेवते आणि त्यातून मुले अनेक गोष्टी शिकतात, हेही या गोष्टीतून स्पष्ट होते.

‘सीमाचा वाढदिवस’ या गोष्टीतून बेरीज-वजाबाकी शिकवणारे पुस्तक आहे. वाढदिवसाची भेट म्हणून मैत्रिणीला पुस्तक भेट देणाऱ्या मुलांची ही गोष्ट आहे. एखादी गोष्ट एकत्र येऊन, आपापले योगदान देऊन कशी करता येते, दैनंदिन आयुष्यातही अभ्यासातल्या काही गोष्टींची उजळणी कशी करता येते, हे स्पष्ट करतानाच वाचनाचे महत्त्वही या गोष्टीने मुलांपुढे ठेवले आहे. अगदी साध्या सवयींमधून मुलांचे व्यक्तिमत्त्व कसे घडवता येते, हे पालकांनाही समजावून सांगणारे हे पुस्तक घरात आणि शाळेतही असायलाच हवे.

‘मीनूचा दोस्त’ ही पावसाची वाट पाहणाऱ्या मीनूची गोष्ट आहे. पाऊस आल्यानंतर सृष्टीत होणारे बदल सांगतानाच लेखिकेने भारतातल्या वर्षां ऋतूविषयी आणि पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीविषयीही सांगितले आहे. अलीकडच्या काळातले हवामानबदल, त्यामागची कारणे आणि निसर्गचक्रात झालेले विपरीत बदल यांचे सूचनही वर्षां गजेंद्रगडकर यांनी या पुस्तकात केले आहे.

‘कुकरची शिट्टी वाजली आणि..’ या पुस्तकातल्या गोष्टीमध्ये मुलांना स्वयंपाकघरात नेऊन वाफेचे कार्य समजावून सांगितले आहे. घरातल्या आणि आपल्या परिसरातल्या अनेक गोष्टींमागचे विज्ञान समजून घेण्याची वृत्ती मुलांमध्ये वाढीला लागण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असे हे पुस्तक आहे.

‘आवाज- गोड आणि कर्कश’हे ध्वनी प्रदूषणाविषयी जागरुकता निर्माण करणारे पुस्तक आहे. दिवसभरात आपल्या कानांवर कोणकोणते आवाज पडतात, त्यापैकी कोणते आवाज आपल्याला अस वाटतात, हे सांगतानाच ध्वनी प्रदूषणाचे माणूस आणि इतर सजीवांवर घातक परिणामही लेखिकेने सोप्या शब्दांत स्पष्ट केले आहेत.

वस्तूंचा पुनर्वापर करण्याचा मोलाचा संदेश ‘आजीच्या युक्त्या’या पुस्तकाने दिला आहे. घरातली वडीलधारी माणसे काटकसरीने कशी जगतात, अनाठायी खर्च कसा करत नाहीत, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू कशा तयार होऊ शकतात, हे सांगतानाच सतत कार्यमग्न राहण्याचे, वेळ सत्कारणी लावण्याचे संस्कार मुलांच्या मनावर करणारे हे पुस्तक आहे. गोष्टीतली आजी अगदी साधे, पण चविष्ट खाद्यपदार्थ बनवते. जुने कपडे, चादरी फेकून न देता त्यापासून घरगुती वापराच्या अनेक गोष्टी बनवते. अशा पुनर्चक्रीकरणामुळे फक्त कुटुंबाचीच नव्हे तर देशाचीही संपत्ती वाचू शकते, निसर्ग अबाधित राहू शकतो, असा मंत्रही या आजीने दिला आहे.

‘पाणी सर्वासाठी’ या पुस्तकात पाणी वाचवण्याच्या दृष्टीने त्याच्या अनेक पैलूंची थोडक्यात माहिती दिली आहे. सजीव सृष्टी पाण्याच्या आधारेच जगत-तगत असते. या पाण्याचा यथायोग्य उपयोग करण्याची जबाबदारी विचारशक्ती लाभलेल्या माणसावर आहे. पाणी हा जीवसृष्टीचा आधार असल्याची जाणीव असल्यानेच नद्यांचे उत्सव साजरे केले जातात. प्राचीन ग्रंथांमध्येही पाण्याच्या रक्षण-संवर्धनाबाबतचे उल्लेख आहेत. पाण्यामागचे वैज्ञानिक वास्तव, पाण्याची उपलब्धता आणि त्याचे प्रदूषण होण्यामागची कारणे स्पष्ट करून जल संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविषयीची माहिती गोळा करणे, पाण्याविषयीच्या कविता, संतवचने शोधणे असे काही उपक्रमही या पुस्तकात शेवटी दिले आहेत. मुलांना पाणी वाचवण्याकरता कृतिशील बनवण्याच्या दृष्टीने हे उपक्रमही महत्त्वाचे आहेत.

‘हवामानशास्त्रज्ञ अन्ना मणी’ हे भारतीय हवामानशास्त्राचा पाया रचणाऱ्या एका महिला वैज्ञानिकेचे छोटेखानी रंजक चरित्र आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांसाठी शिक्षणाच्या संधी मर्यादित होत्या. मुलींना शिकवण्याबाबत कौटुंबिक वातावरणही अनुकूल नसायचे. पण लहानपणापासून वाचनाची, अभ्यासाची आवड असलेल्या अन्ना मणींनी सगळय़ा अडचणींवर मात करून हवामानशास्त्राच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आणि देशाचे नाव मोठे केले. शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरक असे हे चरित्र आहे.

वर्षां गजेंद्रगडकर यांनी या दहा पुस्तकांमधून अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत मुलांशी संवाद साधला आहे. १६ ते २४ अशी छोटेखानीच पृष्ठसंख्या असणाऱ्या या पुस्तकांना अतिशय देखण्या चित्रांची जोड मिळाली आहे. या पुस्तकांची किंमत ८० ते १२० रुपये इतकी आहे. गोष्टींमधून विज्ञानाचे आणि चांगला माणूस बनण्याचे संस्कार करण्यासाठी ही पुस्तके नक्कीच मदत करतील.

‘वाघोबाचा पत्ता’, ‘नागोबाचं वेटोळं’, ‘रोहनचा रविवार’, ‘सीमाचा वाढदिवस’, ‘मीनूचा दोस्त’, ‘कुकरची शिट्टी वाजली आणि..’, ‘आवाज- गोड आणि कर्कश’, ‘आजीच्या युक्त्या’, ‘पाणी सर्वासाठी’, ‘हवामानशास्त्रज्ञ अन्ना मणी’,

– वर्षां गजेंद्रगडकर, राजहंस प्रकाशन, पुणे.

बाजारात दाखल

निवडक जोसेफ तुस्कानो : संपादन-मनोज आचार्य-  नवचैतन्य प्रकाशन

ट्रोलधाड :  वर्षां किडे-कुळकर्णी –  सप्तर्षी प्रकाशन