पुणे : परतीच्या पावसामुळे घाऊक बाजारात फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांचे दर स्थिर असून, नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर फळभाज्यांना मागणी बेताची राहणार आहे. हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली असून, फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१५ ऑक्टोबर) राज्य, तसेच परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात ८० ट्रक फळभाज्यांची आवक घाऊक बाजारात झाली होती. गुजरात, कर्नाटकमधून ७ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ३ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ३ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ टेम्पो घेवडा, इंदूरमधून ५ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ८ टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ६० ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ७०० गोणी, टोमॅटो ८ हजार पेटी, फ्लाॅवर १० टेम्पो, काकडी ७ टेम्पो, भुईमूग शेंग ५० गोणी, ढोबळी मिरची ८ टेम्पो, तांबडा भोपळा ४ ते ५ टेम्पाे, कांदा ६० ट्रक अशी आवक झाली.