शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं, अमित शाह हे खरं बोलले ते शिवसेनेला फार झोंबलं. शिवसेनेने प्रतिक्रिया दिली की, आजपर्यंत शिवसेनेला कोणी संपवू शकलेलं नाही, मुख्य म्हणजे अमित शाह यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केलेलीच नाही असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले गिरीश प्रभुणे यांची भेट घेण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चिंचवड येथील गुरुकुलम येथे आले होते. तेव्हा, त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

अमित शाह रविवारी कोकणात खासदार नारायण राणे यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी बोलताना अमित शाह यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली होती. तोच संदर्भ घेऊन चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं.
“१४-१५ महिने सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे सरकारचा व्यवहार चालला आहे. तो आम्ही पाच वर्षे आमच्याकडे राज्य असताना केला असता तर शिवसेना संपली असती, हे खरं आहे. आम्ही कधी खुन्नसने वागलो नाही. सरकार सरकार आहे. जुने हिशोब काढून बसण्याचं कारण नाही. शिवसेनेला आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. त्यानुसार त्यांनी प्रतिक्रिया दिल्या” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“त्यांच्या म्हणण्याला आम्ही काही घाबरत नाहीत. आम्हाला जे म्हणायचं ते छाती ठोक पणे म्हणतो. समोरच्या व्यक्तीला टाकून बोलणं, लागून बोलणं ही आमची, अमित शाह यांची संस्कृती नाही” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

आणखी वाचा- “आम्ही कधीही नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा….,” संजय राऊत आपल्या भूमिकेवर ठाम

“वैभववाडी येथे १७ पैकी १७ नगरसेवक हे भाजपाचे आहेत. पैकी सहा गेले. जाण येणं त्या त्या कारणाने होत असतं. अमित शाह यांच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार येईल अन वैभववाडीचे सहा नगरसेवक गेले या दोन्हीचा संबंध नाही. अमित शहा यांच्या पायगुणाने सरकार येणार असेल ते येईलच. वैभववाडीचे नगर सेवक गेल्यामुळे ते येणार नाही असं नाही” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.