तिवरे धरण फुटण्याला खेकडे कारणीभूत असल्याचे सांगत या गंभीर प्रकरणातून सरकार अंग काढून घेत आहे. खेकड्यांवर आरोप करून हे प्रश्न सुटणार नाहीत. खेकड्यांनी हे धरण फोडले असा आरोप संबंधित मंत्री व अधिकारी करीत असतील तर त्या खेकड्यांवर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने कोल्हापुरात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात निषेध आंदोलनादरम्यान करण्यात आली.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला काही वर्षांपासून तडे गेले होते स्थानिकांनी त्यासंबंधी विभागाला अनेक वेळा निवेदने देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती. परंतू सरकारच्या निष्काळजीपणामुळे धरण फुटून आज निष्पाप २३ जणांचा बळी गेला. शासनाला या गोष्टीचे गांभीर्य तर नाहीच तर उलट जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री तानाजी सावंत बेताल वक्तव्य करीत आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी रविकांत वर्पे, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी डॉ. शैलेश मोहिते, अदिल फरास, बाळासाहेब महामूनकर, रोहित पाटील, महेंद्र चव्हाण, राकेश कामठे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.