महायुतीची सत्ता आल्यावर राज्यात स्थानिक संस्था कर (एलबीटी) माफ करण्यात येईल, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
नांदेड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डी. बी. पाटील यांच्या प्रचारार्थ ओम गार्डन येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उमेदवार पाटील, सुहास सामंत, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे आदी उपस्थित होते. ठाकरे यांनी या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. राज्यात अनेक महापालिका हद्दीत एलबीटीमुळे व्यापारी त्रस्त आहेत. अनेक मोठय़ा शहरातील व्यापार परराज्यात जात आहेत. त्यामुळे महायुतीचे सरकार आल्यास एलबीटी रद्द करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
आदर्श प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना त्यांनी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. तुमची एकजूट असती, तर चव्हाणांचा प्रभाव वाढला नसता. निवडणुकीत तुमची दाकद दाखवा, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेना सोडून काहीजण निघून गेले, त्यामुळे पक्षाला फारसा फरक पडत नाही. महासागराला कधी गळती लागते काय, असा सवाल करून िशतोडे उडाले तर उडू द्या. आज देशापुढे अनेक प्रश्न उभे आहेत. भ्रष्टाचारी देश म्हणून जगात आपली ओळख होत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. युद्धनौका भंगारात निघाल्यात. शिवरायांच्या महाराष्ट्रात एमआयएमसारख्या जात्यंध पक्ष पाळेमुळे रोवत आहे. या सर्व बाबींचा विचार करून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रवीण जेठेवाड यांच्यावर पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे व त्यांच्या पथकाने केलेल्या लाठीहल्ल्याचा ठाकरे यांनी तीव्र निषेध केला. नांदेडात काँग्रेस नेत्यांनी रझाकारी सुरू केली आहे. त्याचा सूड उगवा, असे आवाहन त्यांनी केले. सेना नेते सुभाष देसाई, डी. बी. पाटील, विजय गव्हाणे, हेमंत पाटील यांचीही भाषणे झाली. प्रल्हाद इंगोले, माजी महापौर सुधाकर पांढरे, भाजप शहराध्यक्ष चतन्यबापू देशमुख, अनसुया खेडकर, डॉ. धनाजीराव देशमुख, डॉ. अजित गोपछडे, राम पाटील रातोळीकर यांची उपस्थिती होती.