राज्यात दुसऱ्यांदा करोनाचा उद्रेक झाल्याने राज्य सरकारने होळी आणि धूलिवंदन साजरी करण्यासाठी नियमावली जारी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी सण साजरा करण्यावर सरकारने निर्बंध घातले असून, त्याविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरे सरकारच्या भूमिकेवर टीका करताना भाजपा नेत्यांनी ‘शिवसेनेचा फतवा धाब्यावर बसवा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून होळी साजरी करा’, असं आवाहन केलं आहे. त्यामुळे होळी आणि धूलिवंदनाच्या सणावरून पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना आमने-सामने आली आहे.

होळीच्या आधीचं करोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यानं राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून होळी व धूलिवंदनासाठी नियमावली जारी केली आहे. संसर्ग रोखण्यासाठी होळीनिमित्त नागरिक एकत्र येण्याच्या शक्यतेनं शहरांत सर्वत्र पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला जाणार आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त ठेवली जाणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करू नये यासाठी पोलिसांनीही नागरिकांना सूचना दिल्या आहेत. होळी आणि धूलिवंदन हा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई केली आहे.

राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नियमावलीवरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार आहे की मुस्लिम लीगचं? शब्बे बारातला परवानगी देऊन ठाकरे सरकारनं होळीवर बंदी घातली आहे. हा हिंदू विरोध खपवून घेणार नाही. हिंदूनों जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा. सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा. चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार,” अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

घरात होळी पेटवायची का?

“हिंदू विरोधी ठाकरे सरकार म्हणतंय होळी घराच्या दारासमोर पेटवायची नाही. तर मग काय घरात पेटवायची? लोक रंगपंचमी समजू शकतात गर्दी होईल. एकमेकांना स्पर्श होईल मात्र नियमांचं पालन करत होळी पेटवली आणि हिंदू बांधवांनी आपला सण साजरा केला, तर त्याला ठाकरे सरकारचा विरोध का? अन्य धर्मांना तातडीनं परवानगी दिली जाते ते काय कोविडचे नातेवाईक लागतात की वसुली सरकारचे?,” अशी टीका भाजपाचे आमदार राम कदम यांनी केली आहे.

होळीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारं होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणानं साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी व निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन करोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचं काटेकोर पालन करूया”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे. तसेच होळी, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत.