दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केलेल्या विधानावरून शिवसेनेनं थेट मोदी सरकारलाच आव्हान दिलं आहे. “जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ‘तुकडे-तुकडे गँग’वर भाजपाचा रोष आहे. देशाचे तुकडे पाडण्यासंदर्भात घोषणाबाजी करणाऱ्यांच्या विरोधात प्रति घोषणाबाजी करण्यापेक्षा पाकव्याप्त कश्मीरसंर्दभात लष्कराला आदेश देऊन धडा शिकवा, हाच उत्तम मार्ग आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

जेएनयूतील विद्यापीठात झालेल्या हल्ल्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाच्या काही मंत्र्यांनी तुकडे-तुकडे गँग याला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. हा वाद सुरू असतानाच देशाचे नवे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे केंद्र सरकारने आदेश दिले, तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ असं म्हटलं होतं. या दोन्ही घटनांवरून शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका केली आहे. “भाजपचे केंद्र सरकार हिमतीचे व हिकमतीचे आहे हे सिद्ध होईल. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ‘तुकडे-तुकडे गँग’वर त्यांचा रोष आहे. देशाचे तुकडे पाडण्यासंदर्भात घोषणाबाजी करणाऱ्यांच्या विरोधात प्रति घोषणाबाजी करण्यापेक्षा ‘तुकडे-तुकडे’ गँगच्या कानाखाली अखंड हिंदुस्थानच्या नकाशाचा जाळ उठवला पाहिजे व त्यालाच आम्ही देशभक्ती म्हणतो. जनरल नरवणे यांनी त्याच दिशेने पाऊल टाकण्यासाठी केंद्राकडे आदेश मागितले आहेत. हिंदुस्थानचे लष्कर हे संविधानात्मक मूल्यांचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे. न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता या तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी आमचे लष्कर कटिबद्ध आहे. नैतिकता, नियम व संकेत पाळणे हे आमच्या लष्कराचे कर्तव्यच आहे. पाकिस्तानी लष्कराप्रमाणे घुसखोरी करणे हा आमच्या लष्कराचा पुरुषार्थ नाही. देशाच्या संसदेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा आदेश लष्करप्रमुखांनी मागितला आहे. केंद्र सरकारने आता माघार घेऊ नये. ‘तुकडे तुकडे गँग’ला धडा शिकवण्याचा हाच उत्तम मार्ग आहे!,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

राजकीय भाकऱ्या शेकणे नित्याचेच झाले –

दिल्ली विधानसभेची निवडणूक होत असून त्यावरूनही शिवसेनेनं भाजपाला अप्रत्यक्ष चिमटा काढला आहे. “लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी चुकीचे काहीच सांगितले नाही. पाकव्याप्त कश्मीरमध्येच सर्वाधिक दहशतवादी तळ व प्रशिक्षण केंद्रे आहेत आणि पाकिस्तानचे लष्कर, आयएसआयच्या पाठिंब्याने हे तळ चालवले जात आहेत. मधल्या काळात सर्जिकल स्ट्राइक होऊनही पाकडय़ांचे शेपूट वाकडे ते वाकडेच. त्यांच्या कुरापती काही थांबलेल्या नाहीत. कश्मीर खोऱ्यात आजही आमच्या सैनिकांचे रक्त सांडले जात आहे. रोज बलिदाने होत आहेत, पण कश्मीरचा प्रश्न हा राजकीय किंवा निवडणुकांपुरताच उसळून वर येतो व त्यावर राजकीय भाकऱ्या शेकल्या जातात. हे आता नित्याचेच झाले आहे,” असा टोला शिवसेनेनं लगावला.