माथाडी कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली माथाडी कायदा नष्ट करण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न होत असल्याने राज्यातील प्रमुख शहरातील बाजार समित्या आज बंद ठेवल्या आहेत. विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य हमाल-माथाडी महामंडळाने आज राज्यातील बाजार समित्या बंद ठेवल्या आहेत. राज्यातील अनेक बाजार समित्या बंद ठेवल्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. आज मुंबईतील आझाद मैदानावार आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनाला १००० कामगार सहभागी झाले असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

राज्यातील माथाडी कामगार कायद्याला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने यंदा माथाडी कायद्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करावा या प्रमुख मागणीसह अन्य अनेक मागण्या केल्या आहेत. पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्ड, सांगली कृषी उत्त्पन्न बाजार समिती, नामपुर कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमध्ये आज दिवसभर बंद पाळण्यात आला.

माथाडी कामगारांच्या प्रमुख मागण्या –
राज्य सरकारने यंदा माथाडी कायद्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करावा
माथाडी कामगारांसाठी सार्वत्रिक पेन्शन सुरु करावी
शेतकऱ्यांना योग्य हमीभाव द्यावा
युवकांना रोजगार मिळावा
माथाडी हमाल-कामगार कायदयांसारखे संरक्षण मिळावे
दुष्काळ निवारण्यासाठी सर्व समावेशक समित्यांची स्थापना सरकारने करावी