जिल्ह्य़ातील नऊ नगर परिषदा आणि दोन नगर पंचायतींच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप प्रदेश उपाध्यक्ष भास्कराव पाटील खतगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलेल्या एका अहवालामुळे पक्षात कुजबुज सुरू झाली आहे. पक्षाचे पदाधिकारी तसेच निष्ठावंतांना खतगावकरांनी करून घेतलेला सर्वे व अहवाल याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. लातूर जिल्ह्य़ातील पालिका निवडणुकांचा प्रचारदौरा आटोपून मुख्यमंत्री फडणवीस रविवारी रात्री उशिरा नांदेड मुक्कामी आले. तत्पूर्वी अहमदपूरहून येथे येताना त्यांनी जानापुरी (ता. लोहा) येथे हुतात्मा संभाजी कदम यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शासकीय मदतीचा धनादेश दिला. मुख्यमंत्री मिनी सह्य़ाद्री विश्रामगृहावर आल्यानंतर खतगावकर यांनी सादर केलेला अहवाल काही कार्यकर्त्यांनी मोबाइल कॅमेऱ्यात टिपला. पक्ष जिल्ह्य़ात नगराध्यक्षपदाच्या आठ जागा कमळ चिन्हावर लढवत असून खतगावकरांच्या बिलोलीत पक्षाने आघाडी करून नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला आहे. नगराध्यक्षांच्या नऊपकी किमान ५ जागा जिंकण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर हे व्यक्त करत असले तरी खतगावकरांनी करून घेतलेल्या सर्वेतून स्थिती भाजपसाठी फार आशादायी नाही, असे समजते. अहवालाच्या अनुषंगाने भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सोमवारी सकाळी ‘व्हॉट्सअॅप’वर एक छायांकित नोंद (पोस्ट) टाकली. त्यानुसार कुंडलवाडी व मुखेड नगराध्यक्षपद भाजपला मिळेली अशा अहवालातील माहितीने ‘पोस्ट’सोबत टाकलेल्या छायाचित्रात मुख्यमंत्री काहीसे चिंताक्रान्त दिसत आहेत. कुंडलवाडीत पक्षाच्या उमेदवाराची प्रतिमा चांगली म्हणून पक्षाला लाभ.. तर मुखेडमध्ये राठोड बंधूंची पकड चांगली म्हणून विजयाची खात्री, असे नमूद करून या पदाधिकाऱ्याने ‘मग काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपाचा काय फायदा?’ असा टोकदार सवाल केल्यानंतर भाजपच्या यशापयशाची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्र्यांनी आधी तीन किंवा चार सभा घेण्याचे मान्य केले होते. सुधारित कार्यक्रमात हदगावच्या सभेचा समावेश झाला. या पहिल्याच सभेत मराठा आरक्षणवाद्यांनी घोषणाबाजी व निदर्शने करून फडणवीस यांना सलामी दिली. भाजपच्या दृष्टीने देगलूर, धर्माबाद व कंधार पालिका खूप महत्त्वाच्या असल्यातरी खतगावकरांच्या अहवालाने सर्व जण बुचकाळ्यात पडले. भाजपचे जिल्हा प्रभारी मनोज पांगारकर यांच्याशी संपर्क साधला असता खतगावकर यांच्या अहवालाबद्दल आपल्याला काहीच ठाऊक नाही. तसेच या विषयावर ते आपल्याशी काहीही बोललेले नाहीत, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पांगारकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.