पुढील पाच दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत जोरदार ते मुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर,पु णे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या पाच जिल्ह्यांना उद्या (२१ जुलै) व परवा (२२ जुलै) रोजी रेड अर्लट देण्यात आला आहे. तर, मुंबईला ऑरेंज अर्लट दिला आहे.

मुंबई-ठाण्यात २१ जुलैला, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत काही ठिकाणी २१, २२ जुलैला अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्य़ांतील घाट क्षेत्रातही याच कालावधीत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्रात हलका, तर विदर्भात काही ठिकाणी मध्यम सरींची शक्यता देखील सांगण्यात आली आहे.

कमी दाबाचा पट्टा आणखी तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने मुंबई, ठाण्यासह कोकणात आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये या कालावधीत जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत गेल्या तीन ते चार दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारीही (१९ जुलै) मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे आदी जिल्ह्य़ांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळला. कोकणात नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून, मुंबई-ठाण्यातील जोरदार पावसाने जनजीवनावर परिणाम झाला आहे. मध्य महाराष्ट्रात नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत हंगामात प्रथमच मुसळधार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.