सोलापूर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात असह्य़ वाढ होऊन ४४ अंशांच्या घरात तापमान वाढले आहे. या वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरश: हैराण झाले आहेत. सकाळी नऊपासूनच उकाडा जाणवत असून यात आबालवृद्धांना अधिक त्रास होत आहे. काल मंगळवारी शहराचे तापमान यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक म्हणजे ४३.७ अंश सेल्सियस इतके वाढले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी तापमानाची हीच परिस्थिती कायम होती. सकाळी नऊपासूनच अंगाला चटके बसू लागल्यामुळे नागरिक रस्त्यावरून फिरणे टाळत आहेत. वाढत्या असह्य़ तापमानामुळे दुपारी बारा ते सायंकाळी चापर्यंत रस्त्यावरील वाहतूक रोडावली आहे. अंगावर चटके बसू लागल्यामुळे हैराण झालेले नागरिक उन्हात कामे करणे टाळत आहेत. ऊन तथा उष्म्यापासून सुटका होण्यासाठी थंडपेयांचा आधार महत्त्वाचा वाटू लागला आहे. डोक्यावर उन्हाळी टोप्या, खांद्यावर पांढरे गमजे घालणे पसंत केले जात आहे, तर महिलावर्ग तोंडावर स्कार्फ घालून फिरताना दिसतो. परंतु ज्यांचे हातावर पोट आहे, अशा कष्टकरी व हमालांना भर उन्हात कामे करावी लागत आहेत.