राज्यात मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू झाली. असं असलं तरी सत्तास्थापनेसाठी बहुमताच्या आकड्याची जुळवाजुवळ करण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांकडून सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या बोलणी सुरू असून, आपण भाजपाची सत्तास्थापन करण्यासाठी वाटेल ते करू. अनेक आमदार संपर्कात आहेत, असं भाजपाचे नेते नारायण राणे म्हणाले. त्याला अजित पवार यांनी नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं आहे.

विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात एकाही पक्षानं सत्तास्थापनेचा दावा न केल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर मंगळवारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. मात्र, सत्तास्थापन करण्यासाठीचे राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरूच आहेत. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपाचे नेते नारायण राणे म्हणाले होते, “भाजपाकडूनही सत्तास्थापनेचे प्रयत्न केले जाणार आहेत. पक्षानं माझ्यावरही जबाबदारी दिली आहे आणि मी सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अनेक आमदार आमच्या संपर्कात असून, त्यांची नावं जाहीर केली तर भाजपात येणार नाही,” असंही राणे म्हणाले होते.

त्यावर “नारायण राणेंनी दिलेली प्रतिक्रिया ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यातील काही राजकीय पक्षांनी जनादेशाचा अनादर केला. राज्यातील शेतकरी संकटात असून अनेक समस्या असताना जनादेशाच्या अनादर करण्यात आला. त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे,” असा स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिले होते.

नारायण राणे यांचा अजित पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीतून समाचार घेतला आहे. यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीनंतर बोलताना अजित पवार म्हणाले, “नारायण राणे यांचं बोलणं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. आजच्या परिस्थितीत कोणत्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही. जर कुणी असा प्रयत्न केला, तर सर्वपक्षीय मिळून त्यांना पराभूत करू. राज्यातील तीन पक्ष एकत्र आलेले आहेत. असं असताना कुणी मायचा लाल निवडून येणार नाही,” असा दावा करत अजित पवार यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं.