रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील मोरोशी गावच्या तरुणाची पोलीस भरतीत मदत करण्याचे आमिष दाखवून ४ लाख ९० हजार ९०६ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश वसंत पांचाळ (वय ३२) रा. शेपें, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग याच्या विरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी लवेश यशवंत कानडे ( वय २८) सध्या रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई याने आरोपी ज्ञानेश पांचाळ याने विजय सुतार नावाचा आर्मी ऑफिसर ओळखतो आणि तो पोलीस भरतीसाठी मदत करू शकतो, असे सांगून लवेश याची फसवणूक केली.
यानंतर आरोपीने डिसेंबर २०२० ते १२ ऑगस्ट २०२४ या दरम्यान वेळोवेळी गुगल पे द्वारे फिर्यादीकडून एकूण ४ लाख ९० हजार ९०६ रुपये घेतले. लवेश याने आरोपीला पैशांबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. शेवटी लवेश कानडे याने दि.३ मे २०२५ रोजी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी ज्ञानेश पांचाळ याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी पांचाळ याच्याविरोधात विरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४) आणि ३१६(२) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.