scorecardresearch

“डायमंड हब सुरतला दिलं, अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल!

अर्थमंत्री सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार टीकास्त्र सोडलं आहे.

aaditya thackeray on nirmala sitaraman
निर्मला सीतारामण – आदित्य ठाकरे (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील शेवटचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार टीकास्त्र सोडलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करण्यात आलं आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

अर्थसंकल्पावर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “केंद्रीय अर्थसंकल्पातून काय मिळालं? हा मोठा सवाल आहे. ज्या राज्यात आताच निवडणुका होऊन गेल्या. जिथे भाजपाने १५० हून अधिक जागा जिंकल्या. त्या राज्यात महाराष्ट्रातून वेदान्त फॉक्सकॉन, टाटा एअरबस, फायनान्शिअल सेंटर आदि कंपन्या गेल्या. त्यांना अधिकच्या सवलतीही मिळाल्या आहेत. मला वाटतं डायमंड हबही सुरतला गेलं आहे. पण या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम झालं आहे.”

हेही वाचा- Budget 2023: “केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसली”, विनायक राऊतांचं टीकास्त्र!

“त्याचबरोबर कर्नाटकात निवडणुका येऊ घातल्या आहेत. तिथे भाजपाला कदाचित कमी जागा येतील, असं एक्झिट पोलमध्ये दिसलं असावं. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात त्या राज्यासाठी खर्च दाखवला आहे. पण राष्ट्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईचा कुठेही उल्लेख झाला नाही. मूळ मुद्दा हाच आहे की, राज्यात एवढी ओढाताण करून घटनाबाह्य सरकार स्थापन केलं. तरीही महाराष्ट्राला आणि मुंबईला कुठेतरी दिल्लीसमोर झुकवायचं आणि काहीच द्यायचं नाही, हे आजच्या अर्थसंकल्पात दिसलं,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 16:46 IST