नांदेडमध्ये आत्तापर्यंत जवळपास ३५ रुग्णांचा मृत्यू होण्याची घटना ताजी असतानाच नागपूर व छत्रपती संभाजीनगरमध्येही असाच प्रकार समोर आल्यामुळे वातावरण तापलं आहे. रुग्णालयातील परिस्थिती व औषधांचा तुटवडा यामुळे हे मृत्यू ओढवल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. सरकारकडून चौकशी चालू असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता विरोधकांनी राज्य सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरेंनी एक्सवर (ट्विटर) यासंदर्भात सविस्तर पोस्ट केली आहे. यामध्ये सरकारच्या निर्लज्ज अकार्यक्षमतेमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “काही आठवड्यांपूर्वी ठाणे (बेकायदा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ) आणि गेल्या तीन दिवसांत नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असणाऱ्या एका राज्यात एका सरकारी रुग्णालयात फक्त ऑक्सिजन किंवा औषधांच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्ण मरण पावतात याची कल्पनाही करवत नाही. त्याहून वाईट म्हणजे राज्य सरकारच्या निर्लज्ज अकार्यक्षमतेमुळे नवजात बालकांचा यामुळे मृत्यू व्हावा”, असं आदित्य ठाकरे या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
“हे सगळं घडत असताना आपले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी गेले. पण त्यांनी या शहरांना किंवा मृतांच्या नातेवाईकांना भेट दिली नाही. जर मी मुख्यमंत्र्यांच्या विदेश दौऱ्याचा किंवा त्यांच्या सुट्टीचा मुद्दा उपस्थित केला नसता, तर आत्ता या घडीला ते बाहेर सुट्टीवर असते”, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे.
“हे मिंधे सरकारला साजेसंच”
“आज ते पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात व्यग्र आहेत. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून ते वाद घालत होते. पण या राष्ट्रीय आपत्तीवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. हे अवमानकारक आणि धक्कादायक आहे. पण मिंधे व भाजपाच्या अकार्यक्षम, घटनाविरोधी व हुकुमशाही वृत्तीच्या सरकारला हे साजेसंच आहे”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे.
अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढणार? रोहित पवार म्हणाले, “मला दिल्लीला…”…
“मुख्यमंत्री राजीनामा देतील का?”
दरम्यान, या पोस्टमध्ये आदित्य ठाकरेंनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “मी राज्य सरकारला मुंबई महानगर पालिकेच्या व राज्य सरकारच्या मुंबईतील रुग्णालयांतल्या परिस्थितीविषयी २९ सप्टेंबर रोजीच राज्य सरकारला लेखी कळवलं आहे. अशी परिस्थिती पुन्हा ओढवू शकते असा इशाराही दिला आहे. आता हे महाराष्ट्रविरोधी अकार्यक्षम सरकार चालवण्याची मुख्यमंत्र्यांना थोडी तरी शरम वाटेल का? ते आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घेतील का? या सगळ्या पार्श्वभूमीवर ते स्वत: राजीनामा देतील का?” असं आदित्य ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.