बुलढाण्यात खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची तब्येत चिंताजनक आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावर मलकापूरजवळ ही घटना घडली.
या अपघाताची माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. एचपी तुम्मोद म्हणाले, “मलकापूर येथे मोठा अपघात झाला आहे. दोन ट्रॅव्हल बसेसची धडक झाल्याने हा अपघात झाला. त्यात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यातील एकाची तब्येत चिंताजनक आहे. त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं आहे.”
नेमकं काय घडलं?
राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूर नजीकच्या लक्ष्मी नगरातील रेल्वे उड्डाणपूलावर शनिवारी (२९ जुलै) पहाटे साडेतीनच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. हिंगोली येथील ट्रॅव्हल्स कंपनीची लक्सरी बस क्र. एम.एच.०८/९४५८ ही अंबरनाथवरुन ४० प्रवाशांना घेऊन परतीच्या वाटेवर होती.
दरम्यान, नागपूरवरुन नाशिककडे जात असलेल्या क्र.एम.एच. २७ बी.एक्स. ४४६६ या बसने समोरच्या बसला चालकाच्या बाजूने चिरत पुढे गेली. त्यामुळे समोरासमोर आलेल्या दोन्ही लक्झरी बसेसमध्ये भीषण अपघात झाला. त्यात हिंगोलीला परतीच्या वाटेवर असलेले ५ प्रवासी जागीच ठार झाले. तर २५ जण गंभीर जखमी झाले. त्यांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अन्य एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम झाला त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
हेही वाचा : बुलढाणा अपघात : नराधम बस चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, पालकांचा आक्रोश
दरम्यान, याआधी बुलढाण्यात १ जुलै रोजी नागपूरहून पुणे येथे जात असलेली विदर्भ ट्रॅव्हल्सची बस दुभाजकावर धडकून उलटल्यानंतर बसने पेट घेतला होता. या अपघातात बसचा चालक, वाहक बचावले होते, पण २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.