कराड : कत्तलीसाठी क्रूरपणे पशुधन नेणाऱ्या दोघा परप्रांतीयांच्या मुसक्या कराड पोलिसांनी आवळल्या. क्रूरपणे वागणूक देत एकाच वाहनातून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ५३ पशुधनांची पोलिसांनी सुटका केली. या वाहनात गोवंशीय पशुधन मिळून आले नसल्याचे कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

कत्तलीसाठी पशुधन घेऊन निघालेल्या कंटेनरला अडवून पोलिसांनी कोल्हापूर नाका येथे ताब्यात घेतले. या कंटेनरमध्ये असलेल्या ५३ पशुधनांची सुटका करण्यात आली. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार संग्राम पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली असून याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बिलाल आयुब खान (३०), तालिम इसा खान (२५ दोघेही रा. रिथट ता. नाघीना, जि. नुह, राज्य हरियाणा) अशी गुन्हा नोंद झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस हवालदार संग्राम पाटील हे गस्त घालत असताना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भापकर यांनी कर्मचाऱ्यांना कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर पुणे- बंगळूरू महामार्गावरून जाणारा कंटेनर अडवण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी कंटेनर अडवून तपासणी केली असता त्यामध्ये वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना पशुधनांना वेदना होतील, अशा रितीने बांधून, तसेच चारा-पाण्याची देखभाल न करता क्रूरपणे वागणूक देऊन कत्तलीसाठी ५३ पशुधन घेऊन निघाल्याचे आढळून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांसमोर आव्हान

हत्येसाठी प्रतिबंध असलेल्या गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा उघड झाले आहेत. गोवंशाची वाहतूक पकडून देण्याचे धाडस अनेक हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्त्यांनी केले आहे. तर, पोलिसांनीही कठोर कारवाईचा बडगा उगारत गोवंशाची वाहतूक आणि कत्तल रोखल्याने गोवंशाची वाहतूक, कत्तल अशा गंभीर गुन्ह्यांना आळा बसला आहे. असे असताना आता कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या अन्य प्रजातीतील पशुधानांचे प्रचंड हाल होत असल्याचे विदारक चित्र आहे. एकाच वाहनातून ५३ पशुधनांची चारा पाण्याविना वेदना देत वाहतूक असल्याचे उघड झाल्याने प्राणिमित्रांतून संताप व्यक्त होत आहे. कत्तलीसाठी क्रूरपणे पशुधन नेणाऱ्यांवर जरब बसवण्याचे आव्हान आता पोलिसांना पेलावे लागणार आहे.