Aaditi Tatkare On Bharat Gogawale : राज्यातील पालकमंत्र्यांची यादी महायुतीच्या सरकारने शनिवारी (१८ जानेवारी) जाहीर केली. मात्र, पालकमंत्री पदाच्या यादीतून काही मंत्र्यांना डावलण्यात आलं. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनाही डावलण्यात आलं. भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. पण रायगडचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आलं. त्यामुळे मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली. आता आदिती तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नाराजीवर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ‘आमच्या कोणत्याही सहकार्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही. पालकमंत्री म्हणून मला जबाबदारी दिलेली असली तरी भरत गोगावले आणि आम्ही समतोल राखून काम करू’, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

“महायुतीच्या कोणत्याही सहकार्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही. पालकमंत्री पदाची जबाबदारी ही आमच्या तीनही नेत्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जबाबदारी दिलेली आहे. भरत गोगावले हे आमचे सहकारी मंत्री आहेत. त्यामुळे जिल्ह्यात काम करत असताना जरी मला पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिलेली असली तरी निश्चितपणे भरत गोगावले यांचा अनेक वर्षांचा जिल्ह्यात काम करण्याचा अनुभव आहे. आता ते मंत्री म्हणून देखील काम करत आहेत. त्यामुळे आम्ही व्यवस्थितपणे समतोल राखून काम करु आणि रायगड जिल्ह्याला कशा पद्धतीने पुढे नेता येईल? यासाठी काम करणार आहोत”, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

सुनील तटकरे काय म्हणाले?

भरत गोगावले यांच्या नाराजीसंदर्भात सुनील तटकरे यांनी म्हटलं की, “ठीक आहे, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं. त्यामुळे जो निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला आहे. त्या निर्णयाचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरत गोगावले काय म्हणाले होते?

पालकमंत्री पदाच्या यादीतून डावलण्यात आल्यानंतर भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली. भरत गोगावले म्हणाले की, “आमच्या सहाच्या सहा आमदारांनी (रायगडच्या) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कळवलं होतं. सर्वांना भेटी घेऊन सांगितलं होतं. त्यानंतर जिल्ह्यातही वातावरण झालं होतं की भरत गोगावले हेच पालकमंत्री व्हावेत. मात्र, आता जे केलं ते अनपेक्षित आहे. पण ठीक आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य करावा लागेल”, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली.