अहिल्यानगर : शाळेच्या आवारातच एका १३ वर्षीय विद्यार्थ्याने १५ वर्षीय विद्यार्थ्याचा चाकूने हल्ला करत खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी शहरात घडली. ही शाळा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. घटनेनंतर शाळेच्या परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. शाळेतील विद्यार्थीही घाबरून गेले होते.
या संदर्भात १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला गुरुवारी बाल न्यायमंडळासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली. दोन्ही मुलांचे कुटुंब शहरात सर्जेपुरा भागात राहतात. या दोन्ही कुटुंबांमध्ये जुना वाद आहे. या वादाचे पडसाद शाळेत उमटले.
ताब्यात घेतलेला १३ वर्षीय विद्यार्थी इयत्ता आठवीत शिकत आहे. तर मृत्युमुखी पडलेला १५ वर्षीय विद्यार्थी दहावीत शिकत आहे. आज शाळेच्या मधल्या सुटीत दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. त्यानंतर आठवीतील विद्यार्थ्याने पंधरा वर्षीय विद्यार्थ्यास मारहाण करून चाकूने हल्ला केला. या घटनेमुळे शाळेत गोंधळ उडाला. शिक्षकांनी धाव घेऊन जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत १३ वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.