अहिल्यानगरः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनीही महिला सैन्याची पहिली तुकडी तयार केली होती. तोफा तयार करून परकीय आक्रमकांना धडकी भरवली होती. पहेलगाम हल्ल्यानंतर भारतानेदेखील ब्रह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्याची माहिती जगाला कळवण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचाच विचार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी चौंडी (ता. जामखेड) येथे बोलताना केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती महोत्सवानिमित्त चौंडी येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, ओबीसी विकास व पशुसंवर्धनमंत्री अतुल सावे, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, माजी मंत्री अण्णा डांगे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्या वेळी राज्यात शस्त्र कारखाना, तोफा तयार करून परकीय आक्रमकांना धडकी भरवली. युद्धसिद्धता केली. तशीच सिद्धता करून पाकिस्तानचे नऊ तळ आपण ब्रह्मोस क्षेपणास्त्राने उद्ध्वस्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी दोन महिला अधिकारी नियुक्त केल्या. अहिल्यादेवी यांनीही त्यांच्या राज्यात महिला सैन्याची पहिली तुकडी तयार केली होती.

वंचित, दलित, आदिवासी यांना शिक्षण व रोजगारासाठी प्रयत्न करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी यांनी वंचितांसाठी राज्य चालवले. आम्हीही तोच आदर्श समोर ठेवून वंचितांसाठी राज्य चालवण्याची प्रतिज्ञा घेत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. अहिल्यादेवींनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर देव, देश व धर्मरक्षणाची जबाबदारी पार पाडली. भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले. त्यांची करपद्धत, कृषिपद्धत, न्यायपद्धत, राज्य कारभाराची पद्धत आदर्श होती. ३०० वर्षांनंतरही त्यांचे विचार प्रेरणादायी व कालसुसंगत आहेत. राज्याच्या उभारणीत दोन नावांची आठवण होते, एक छत्रपती शिवाजी महाराज व दुसऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, असा गौरव मुख्यमंत्र्यांनी केला.

मंत्री भरणे, आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाषण झाले. या वेळी आमदार शिवाजी कर्डिले, विठ्ठल लंघे, मोनिका राजळे, अमोल खताळ, चित्रा वाघ, माजी आमदार बबन पाचपुते, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा चौंडीच्या सरपंच मालन शिंदे यांनी काठी, घोंगडे देऊन सत्कार केला. या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तक व विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

राष्ट्रपती, पंतप्रधान येणार

राष्ट्रपती व पंतप्रधानांना ३०० व्या जयंती महोत्सवाचे आमंत्रण दिले होते. मात्र, पंतप्रधानांनी पुढील वर्षी येण्याचे आश्वासन दिले आहे. राष्ट्रपतींना आमंत्रण देताना काहीसा उशीर झाला. त्याचबरोबर हवामानाचाही प्रश्न निर्माण झाला होता. पंतप्रधान व राष्ट्रपती दोघेही चौंडीला लवकरच येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

‘लाडक्या बहिणी’चा शब्द टप्प्याटप्प्याने पाळणार

विरोधकांनी कितीही आकांडतांडव केला, टीका-आरोप केले, तरीही आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. दिलेला शब्द टप्प्याटप्प्याने का होईना आम्ही पाळणार, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी, महिलांना अन्यायाविरुद्ध नेटाने तोंड देण्याचा विचार दिला. त्याप्रमाणे महिलांनी छळामुळे जीव देऊ नये, लोकांनीही सुनेचा छळ करू नये. सुनेचा छळ करणारी वृत्ती ठेचून काढावी, असे आवाहन त्यांनी केले.

एकल महिलांसाठी पुनर्वसन प्रकल्प

जिल्ह्यात १ लाखांवर एकल महिला आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी अहिल्यादेवी यांच्या नावाने कौशल्य विकास प्रकल्प राबवला जाणार आहे. त्याचबरोबर नगर शहरात अहिल्यादेवींचे स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी ५०० कोटींची मागणी

मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळ विकास आराखड्यास ६८१ कोटी रुपये मंजूर केले, त्याबद्दल सभापती राम शिंदे यांनी धन्यवाद देतानाच आणखी ५०० कोटी रुपयांची मागणी केली. चौंडीला जोडणारे सर्व रस्ते विकसित करण्यासाठी, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धरतीवर पुतळा उभारून भूमिगत बंधाऱ्यासाठी हा निधी पुरवणी अंदाजपत्रकात मंजूर करण्याची मागणी केली.