अहिल्यानगर : महापालिकेने नागरिकांच्या सहभागातून दर रविवारी ‘डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियान’ सुरू केले आहे. या अंतर्गत आरोग्य विभागाची पथके दर आठवड्याला शहरातील १ हजार घरांना भेटी देऊन सर्वेक्षण व उपायोजना करणार आहे. आज, रविवारपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. डास- अळींची उत्पत्ती रोखली जावी, यासाठी आठवड्यातून एक दिवस नागरिकांनी ‘कोरडा दिवस पाळावा’ व या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.
मागील वर्षीही महापालिकेने डेंग्यूमुक्त शहर अभियान राबवले होते. त्यावेळी नागरिक व विविध संघटनांचा प्रतिसाद लाभला होता. यंदाच्या अभियानात आरोग्य विभागाचे १२ वैद्यकीय अधिकारी, १ साथरोग अधिकारी, १५ परिचारिका, ४१ आरोग्य कर्मचारी, १६ मलेरिया कर्मचारी, २५ आशा स्वयंसेविका असे ११० कर्मचारी अभियानाच्या माध्यमातून २० पथकांद्वारे १ हजार घरांतील ५ हजार लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करणार आहेत. आज हे अभियान सुरू करण्यात आले. डेंग्यू प्रतिबंधासाठी, डास-अळीची उत्पत्ती रोखण्यासाठी जनजागृती करणे, डास-अळी नियंत्रण कार्यक्रम, पाणीसाठ्यांची तपासणी, पाणी साठवले जाणारे अथवा दूषित पाणी साठलेले कंटेनर शोधून रिकामे करणे, पाण्यात अळीनाशक ॲबेट टाकणे, डासनाशक फवारणी करणे, डास-अळी सापडलेल्या घरांवर स्टिकर लावणे, तापसदृश्य रुग्णांचे सर्व्हेक्षण, मलेरिया स्लाईड घेणे, आरोग्य शिक्षण देणे, डास उत्पत्ती प्रतिबंधात्मक उपाय करणे, नागरिकांना जनजागृतीची माहितिपत्रके वाटणे आदी अभियानातून राबवले जाणार आहे.
नागरिकांनीही या अभियानात सहभागी व्हावे. एक दिवस कोरडा दिवस पाळावा व स्वतःच्या घराची तपासणी करून साचलेले पाणी काढून टाकावे, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे.