अहिल्यानगर : अमृत महाआवास अभियानात अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल आज, मंगळवारी केंद्रीय ग्रामविकास व कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात जिल्ह्याचा गौरव करण्यात आला. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पाच मानांकनामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याला सहा पुरस्कार प्राप्त झाले.
त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना राज्यात सर्वोत्कृष्ट जिल्हा, प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वोत्कृष्ट तालुका (पाथर्डी), राज्य पुरस्कृत आवास योजनेत सर्वोत्कृष्ट जिल्हा, राज्य पुरस्कृत योजनेत सर्वोत्कृष्ट तालुका (जामखेड), राज्यात सर्वोत्कृष्ट गृह संकुल (ग्रामपंचायत वांगदरी, श्रीगोंदा), राज्य पुरस्कृत योजनेत सर्वोत्कृष्ट गृहसंकुल (नांदगाव, ग्रामपंचायत, ता. अहिल्यानगर) असे सहा पुरस्कार मिळाले.
अमृत आवास अभियान सन २०२२-२३ या वर्षात राबविण्यात आले. या कालावधीत जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास योजनेत १५ हजार ३२२ व राज्य पुरस्कृत योजनेत ५०३२ असे एकूण १५ हजार ३२२ घरकुले पूर्ण केली. जिल्ह्यात एकूण १० गृहसंकुले उभारून ३०० लाभार्थ्यांना सर्व सुविधायुक्त घरकुलांचा लाभ दिला. पुण्यातील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री चौहान यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ आनंद येरेकर, सध्याचे सीईओ आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, प्रकल्प संचालक राहुल शेळके, सहायक अभियंता किरण साळवे यांनी पुरस्कार स्वीकारला.