अहिल्यानगर : अवैधपणे घुसखोरी करून राहणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना एमआयडीसी पोलिसांनी आज, गुरुवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा व्हिसा अथवा राहण्याचा परवाना नव्हता. पोलिसांच्या या कारवाईसाठी लष्कराच्या सदन कमांड विभागाच्या गोपनीय शाखेची मदत घेण्यात आली. या तिघांना न्यायालयाने आज, शुक्रवारी तीन दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी यांनी ही माहिती दिली. जहांगीर अबूताहेर शेख (वय ३४, हाजीगंज, चेटोग्राम, बांगलादेश), हनीफ अब्दुल खलील शेख (वय ४०, खजीरखली, शेवरहाट, बांगलादेश व मुस्त्रफ हबीब शेख (वय ४०, सातपुरा, हाजीगंज, चेटोग्राम, बांगलादेश) अशी तिघांची नावे आहेत. या तिघांकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व इतरही बनावट ओळखपत्रे आढळली आहेत. ती पोलिसांनी जप्त केली आहेत.
यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोखर्डी (या. अहिल्यानगर) गावाच्या शिवारात वारुळे वस्ती येथे एका खर्डी क्रशरवर काम करत होते व तेथे जवळच एका खोलीमध्ये राहत होते. यातील एका बांगलादेशीला मराठी येत असल्यामुळे अनेक वर्षांपासून तो येथे वास्तव्यास असल्याचे स्पष्ट होते.
तिघेही कोणत्या मार्गे भारतात आले याची चौकशी केली जात असल्याचे सहाय्यक निरीक्षक चौधरी यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी अहिल्यानगर तालुक्यातील खंडाळा शिवारातही पाच बांगलादेशी घुसखोर आढळले होते. तेही गावातील खडी क्रशरवर काम करत होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दहशतवाद विरोधी कक्षातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन बांगलादेशी घुसखोर शोधण्याची सूचना केली होती.