परभणी : अडीच महिन्यापूर्वी म्हणजे ३१ मार्च २०२५ रोजी डॉक्टरांकडे आलेल्या १३- १४ वयाच्या मुलाची तक्रार होती अंगदुखीची. डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना आधी डेंग्यूची लक्षणे वाटली. त्यांनी रक्त घटक तपासणीचा सल्ला दिला. पूर्वीही काही तपासण्याच्या त्याच्या झाल्या होत्या. परभणी शहरातील उद्यति रक्त- लघवी तपसणीच्या केंद्रात कृत्रिम बुद्धेमत्तेच्या आधारे होणाऱ्या चाचणी केंद्रात या मुलाच्या रक्ताचा थेंब तपासण्यास घेतला आणि अंतिम निष्कर्ष आला – कर्करोग. तपासणी आणि निदान यात अचुकता असेल तर उपचार लवकर सुरू होतात. अन्यथा वेळ वाया जातो. कमी वेळात अचूक निदान झाल्याने या मुलावर तातडीने उपचार सुरू झाले. अशी अनेक उदाहरणे आता परभणीच्या आरोग्य तपसणीचे नवे प्रारुप बनू लागले आहे. डॉ. चैतन्य खिल्लारे यांनी तपासणीमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेच्या यंत्राला उपयोग सुरू केला आहे. कर्करोगासह विविध प्रकारचे निदान चुकण्याची शक्यता त्यामुळे मावळली आहे.
डॉ. खिल्लारे म्हणाले, या मुलाच्या ‘ प्लेटलेट’ ची संख्या तशी कमी होती. त्यामुळे त्यास डेंग्यू असावा असे डॉक्टरांना वाटत होते. पण या मुलाचा ज्वर खूप कमी जास्त होत होता. त्यामुळे नव्या तपासण्या करण्यास सांगण्यात आल्या. एरवी ही तपासणीही ‘ मायक्रोस्कोप’ खाली झाली असती तर कर्करोगाच्या पेशी कमी जास्तीही सांगितल्या गेल्या असत्या. किंवा कर्करोगाचे निदान करण्यापूर्वी काचपट्टीवरील निरीक्षणे आणखी दोन – तीन निरीक्षकास दाखवावी लागली असती. मात्र, नव्या यंत्रणेमुळे आता निदानामध्ये अचूकता आल्याचे डॉ. खिल्लारे सांगतात. रोग निदान तज्ज्ञ म्हणून २०१८ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. खिल्लारे यांनी परभणीमध्ये ऑक्टोबरमध्ये उद्यति पॅथॉलॉजी सुरू केली.
रक्त आणि लघवी तपासणी हे वैद्यकीय उपचारापूर्वीच्या निदानात कृत्रिम बुद्धीमत्ता आल्याने परभणीसारख्या आडवळणी भागात निदान आणि उपचार यातील कालावधी दोन दिवसांवरून एका तासावर आल्याचे डॉ. चैतन्य सांगतात. रक्त तपासणीसाठी ‘ सिग तुपले एआय १००० (SigTuple AI1000 ) हे उपकरण चैतन्य यांनी ते बंगलोर येथून मागवले. डॉ. चैतन्य यांच्यासोबत डॉ. शिवकन्या रसाळ हे दोघे निदान करण्यासाठी त्याचा वापर करतात. अडीच महिन्यापूर्वी तपासणी केलेल्या मुलास तपासणीनंतर छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ हलवण्यात आले. पारंपरिक पद्धतीने या तपासण्या झाल्या असत्या तर अहवाल यायला विलंब झाला असता. केवळ रक्त नाही तर मूत्र तपासणीसाठी सुद्धा युराईज्ड मिनी – २ सारख्या उपकरणांचा वापर प्रयोगशाळेत केला जात आहे. या युरोपियन उपकरणात संबंधित रुग्णाच्या मूत्राचा एक थेंब दिल्याबरोबर त्यात ‘पू’ पेशी , जीवाणू, बुरशी जन्य घटक याचे निदान होते.
जवळपास तेरा चाचण्या करणारे हे उपकरण असल्याचे डॉ. चैतन्य सांगतात. मराठवाड्यात हे उपकरण पहिल्यांदा बसवले तेव्हा देशातलं ते ९७ वे उपकरण होते.संपूर्ण शरीर तपासणीत आता या तंत्राचा वापर होत आहे. तांत्रिक माहिती सर्वसामान्यांसाठी सुलभरीत्या दिली जात आहे आणि अचूक सेवेद्वारे आरोग्य क्षेत्रात काम करता येत असल्याचे समाधान डॉ. चैतन्य यांनी व्यक्त केले. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण परभणीमध्ये झाले. एमबीबीएस पॅथॉलॉजी त्यांनी ‘एमजीएम’ मधून छत्रपती संभाजीनगर येथे तर पदव्युत्तर शिक्षण पुणे येथे घेतले आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे आरोग्य क्षेत्रात नवनवीन बदल होतच होते आता तपासणीमध्ये नव्या तंत्रज्ञानामुळे अचूकता वाढेल असे सांगण्यात येते.