सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास देश पातळीवरील साखर उद्योगाशी सलग्न असलेल्या भारतीय शुगर्स या नामांकित संस्थेचा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना (बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स शुगर मिल) हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार लवकरच समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे भारतीय शुगर्सचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी सांगीतले.

स्वर्गीय छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांनी उभारलेल्या व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. अजिंक्यतारा कारखान्यास सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र विक्रमसिंह शिंदे यांनी समक्ष भेटून कारखान्याचे अध्यक्ष यशवंत हरी साळुंखे व उपाध्यक्ष नामदेव विष्णू सावंत यांचेकडे सुपुर्द केले. यावेळी भारतीय शुगर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संग्रामसिंह शिंदे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते तसेच कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.

भारतीय शुगर्सचे अध्यक्ष शिंदे म्हणाले, १९७५ पासून सदर संस्था कार्यान्वित आहे. अजिंक्यतारा कारखान्यास जाहीर झालेला पुरस्कार हा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम पुरस्कार असून त्याचे स्वरूप १ लाख रुपये रोख, ट्रॉफी व प्रशस्तिपत्र असे आहे. हा पुरस्कार अजिंक्यतारा कारखान्यास १८ जुलै रोजी समारंभपूर्वक कोल्हापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, सर्व सभासद, बिगर सभासद, अधिकारी, कामगार- कर्मचारी, ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदार व हितचिंतक यांचे अभिनंदन केले आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहिते यांनी यावेळी सांगितले की, कारखान्याने दैनंदिन गाळप क्षमता २५०० वरून ४५०० टन केली, तसेच आसवणी क्षमता ३० हजार लिटर प्रतिदिनवरून ४५ हजार लिटर केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्यामध्ये स्टीमचा वापर कमी करणे, पाण्याचा वापर कमी करणे, बगॅस बचत करणे, पर्यावरण संतुलन राखणे, साखरेची प्रतवारी सुधारणे इ. तांत्रिक कामे केली आहेत. तसेच शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत देण्याची परंपरा राखलेली आहे. या बाबींचा विचार करून भारतीय शुगर्स या नामांकित संस्थेने देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केलेला आहे. अजिंक्यतारा कारखान्याला राज्य व राष्ट्रीय पातळीवरील २९ पुरस्कार मिळालेले आहेत. हा पुरस्कार मिळाल्याने कारखाना कार्यक्षेत्रात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.