Ajit Pawar Challenges Opposition: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे सत्ताधारी महायुतीत सहभागी होण्याआधी लपून-छपून दिल्लीत जात होते, असे दावे केले जात आहेत. एक-दोनदा नव्हे, तर तब्बल १० वेळा अजित पवार दिल्लीला गेले होते, असं सांगितलं जात आहे. यासाठी अजित पवारांनीच माध्यम प्रतिनिधींशी केलेल्या अनौपचारिक गप्पांचा दाखला दिला जात आहे. मात्र, आज अजित पवारांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली असून हे सर्व आरोप धादांत खोटे असल्याचं ते म्हणाले आहेत.
अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी तिथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर दिल्ली दौऱ्याबाबत करण्यात येणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. “माझी बदनामी करण्यासाठी फक्त आरोप केले जात आहेत. मी ३५ वर्षांपासून राजकारणात कार्यरत आहे. ओळख लपवून कुठे जाणं हा गुन्हा आहे हे मला माहिती आहे. मला जर कुठे जायचं असेल, तर मी उजळ माथ्याने जाईन. मला लपून-छपून जाण्याची गरज नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
सुप्रिया सुळेंनी काय टीका केली होती?
सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या या दाव्यांबाबत माध्यमांनी विचारणा केली असता त्यावरून टीका केली होती. “अजित पवार हे नाव आणि वेश बदलून ते दिल्लीला जात असत असं त्यांनीच म्हटलं आहे. याबाबत मला तीन ते चार प्रश्न विचारायचे आहेत. त्यावेळी तु्म्ही विरोधी पक्षनेते होतात. मग विरोधी पक्षनेते असतानाही तुम्ही अमित शाह यांना का भेटत होतात? आता तुम्ही हे ही कबूल केलं आहे की तुम्ही अमित शाह यांना चोरून भेटत होतात. त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधात बोलत होतात आणि दुसरीकडे दिल्लीत त्यांच्याच नेत्यांना भेटत होतात. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राशी गद्दारी केली”, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली होती.
“दुसरा मुद्दा असा आहे की, अजित पवार सातत्याने नाव बदलून दिल्लीला जात होते. पण हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांना विमानाने यायचं म्हटलं तर आधार कार्ड लागतं. आता अजित पवारांनी असं केलं तर उध्या एखादा दहशतवादी असं करेल. तोही नाव बदलून येईल. याची जबाबदारी कोण घेणार? यामध्ये मुंबई आणि दिल्ली विमानतळाची चौकशी झाली पाहिजे. तसंच एअरलाईन्सची देखील चौकशी झाली पाहिजे”, अशीही भूमिका सुप्रिया सुळेंनी मांडली.

“…तर मी राजकारण सोडेन”
दरम्यान, अजित पवारांना यावेळी सुप्रिया सुळेंनी संसदेत यासंदर्भात मुद्दा उपस्थित केल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलं. “माझं संसदेलाही आव्हान आहे. तपासून पाहावं. खरं असेल तर मी राजकारणातून बाजूला होईन. खरं नसेल, तर तर ज्यांनी संसदेत कोणताही पुरावा नसताना, खरी माहिती जाणून न घेता आरोप केले, त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा”, असं आव्हान अजित पवारांनी दिलं आहे.
“मला सगळ्यांना विचारायचंय की तुम्ही मला कुठे बघितलं? म्हणे १० वेळा दिल्लीत जाऊन भेटलो. मी लोकशाहीत काम करतो. मला कुठे जायचं असेल तर मी उजळ माथ्याने जाईन. मला लपून-छपून जायची गरज नाही. बातम्या माध्यमांमधून छापून आणायच्या आणि त्यानंतर विरोधकांनी ठरवून अपप्रचार करायचा असं केलं जात आहे. त्यासंदर्भात आलेल्या एकाही बातमीत तसूभरही तथ्य नाही”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.