Dhananjay Munde on Anjali Damania : बीड जिल्ह्यातील सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. काल (२७ जानेवारी) अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी या भेटीत अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. तसेच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या एकत्र कंपन्यांचे काही कागदपत्रही अजित पवार यांच्याकडे दिले असल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं. यावर आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, “राजीनामा विषयावर मी उत्तर देणार नाही. अंजली दमानिया अजित दादांना भेटल्या आहेत. कागदपत्रांसहित त्या अजित पवारांना भेटल्या. त्यामुळे या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देतील. ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी इच्छा आहे.”

ते पुढे म्हणाले, ” सर्वोच्च न्यायालयाने २००६ साली दिलेल्या निकालानुसार थर्मल पॉवर स्टेशनने केलेला कचरा त्यांना स्वतःच्या पैशांनी उचलला पाहिजे, असा निकाल देण्यात आला होता. त्यामुळे हा निर्णय थेट सरकारशी संलग्न नाही. महानिर्मिती हे मंडळ आहे. त्यामुळे प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा विषय येत नाही”, असं म्हणत त्यांनी राखेच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं.

कृष्णा आंधळे सापडणार का?

आमदार संदीप क्षीरसागर यांनी दावा केलाय की संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे सापडणारच नाही. यावर धनंजय मुंडे म्हणाले, याचा अर्थ संदीप क्षीरसागर यांचे कृष्णा आंधळे यांच्याबरोबर संबंध असतील. म्हणूनच त्यांना याबाबत अधिकची माहिती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांच्या भेटीनंतर अंजली दमानिया काय म्हणाल्या होत्या?

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मी २५ ते ३० मिनिटे चर्चा केली. त्यांचं म्हणणं असं होतं की बीडमध्ये जी घटना घडली ती घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. त्या घटनेचं कुठेही समर्थन करत नाहीत. तसेच मी अजित पवारांना काही पुरावे दाखवले. कशा पद्धतीने धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र व्यवसाय आहेत? त्यांच्या कंपन्यामध्ये आर्थिक नफा कसा मिळतो? हे सर्व अजित पवारांना सांगितलं आहे. तसेच धनंजय मुंडेंचा राजीनामा कुठल्याही परिस्थिती घेतला पाहिजे हे त्यांना सांगितलं आहे”, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं.