प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. ३० पेक्षा अधिक ऐतिहासिक चित्रपटांत त्यांनी कलादिग्दर्शनाचं काम केलं होतं. नितीन देसाईंच्या आत्महत्येनं चित्रपट विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी आर्थिक तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नितीन देसाई यांच्या आत्महत्येबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नितीन देसाई हे माझे अतिशय जवळचे मित्र होते. त्यांना अनेक लोकांनी ब्लॅकमेल केलं, असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. ब्लॅकमेल करणारे लोक मुंबई MMRDA शी संबंधित आहेत, असा दावाही आव्हाडांनी केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, “नितीन चंद्रकांत देसाई हे माझे अतिशय जवळचे मित्र होते. नितीन देसाईंनी कधीही रस्त्यावर डेकोरेशन केलं नव्हतं. पण त्यांनी पहिल्यांदा माझ्या गणपतीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर भलंमोठं डेकोरेशन केलं. ते नितीन देसाईंचं रस्त्यावरील पहिलं डेकोरेशन होतं. मागच्या तीन वर्षात नितीन देसाईंच्या ज्या आर्थिक उलाढाली झाल्या, त्या सर्व उलाढालींची कसून चौकशी व्हायला पाहिजे. तसेच दरम्यानच्या काळात त्यांच्या कुणा-कुणाशी भेटी झाल्या? कोण-कोण त्यांच्याविरोधात बोललं? या सगळ्याची माहिती घेतली पाहिजे आणि त्या सर्वांची चौकशी केली पाहिजे. या चौकशींमधून सत्य बाहेर आलं पाहिजे. नितीन देसाईंना अनेकांनी ब्लॅकमेल केलं आहे. ते ब्लॅकमेल करणारे कोण आहेत? याचा शोध पोलिसांनी घ्यायला पाहिजे.”
“Edelweiss या वित्त कंपनीच्या मालकाचा नितीन देसाईंच्या आत्महत्येशी संबंध असेल तर त्यालाही तुरुंगात टाका. त्याचबरोबर नितीन देसाईंना आणखी कुणी-कुणी छळलं, हे त्यांच्या जवळच्या मित्रांना माहीत आहे. त्यांच्या आत्महत्येशी गुजरातचं काहीही कनेक्शन नाही. सगळं कनेक्शन मुंबईच्या MMRDA शी आहे. माझा कुणावरही रोख नाही. पण पोलिसांनी व्यवस्थित शोध घ्यावा, आरोपी आपोआप ताब्यात येईल,” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.