Ashok Chavan on Nana Patole : लोकसभेत भरघोस यश मिळवणाऱ्या काँग्रेसची विधानसभा निवडणुकीत मात्र चांगलीच पिछेहाट झाली. देशातील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला महाराष्ट्रात अवघ्या १६ जागा जिंकता आल्या. यामुळे काँग्रेसवर सर्वत्र टीका होत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कधीकाळी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते राहिलेले अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसवर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

“काँग्रेसने आत्मपरिक्षण करावं. काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे”, असं भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण म्हणाले. ते पुढे म्हणाले, “मी राज्याचा प्रमुख असताना ८२ जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले, त्यांनी ८२ च्या ४२ केल्या आणि नानांनी ४२ वरून १६ वर आणलं. मला काही यावर अधिक सांगायची गरज नाही.”

मी १४ वर्षे वनवास भोगला

“एकंदरीत जी परिस्थिती आहे त्याचं आकलन केलं पाहिजे. आत्मपरिक्षण करून निर्णय घ्यावा. काँग्रेसमध्ये जाणकार, लोकप्रिय माणसं आहे”, असंही अशोक चव्हाण म्हणाले. ते पुढे म्हणाले, “मलाही भावना आहेत. ज्या पद्धतीने १४ वर्षे वनवास भोगला, मला व्यक्तिगत कोणावरही आकस नाहीय. कोणावरही विनाकारण टीका करत नाही. शेवटी मी मनुष्य आहे.”

हेही वाचा >> Bunty Shelke: ‘नाना पटोलेंचे RSS शी संबंध, म्हणूनच काँग्रेसचा पराभव’, नागपूरच्या पराभूत उमेदवाराचा धक्कादायक आरोप

दरम्यान, काँग्रेसच्या पराभवाची असंख्य कारणं सांगितली जात आहेत. त्यात नाना पटोले सर्वांत मध्यभागी आहेत. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनीही नाना पटोले यांच्यावर रोख ठेवला आहे.  काँग्रेसने १०१ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना केवळ १६ जागांवर विजय मिळू शकला. काँग्रेसचा ८५ जागांवर झालेल्या पराभवाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारणीभूत आहेत. तसेच नाना पटोले संघाशी जोडलेले आहेत, असा आरोप बंटी शेळके यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिलेले बंटी शेळके यावेळी विजयाचे दावेदार समजले जात होते. २०१९ साली त्यांनी निवडणूक लढविली होती, त्यावेळी त्यांचा केवळ चार हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळी विजय नक्की मिळवू या उत्साहात ते प्रचाराला लागले होते. यासाठी त्यांनी प्रचारादरम्यान भाजपा कार्यालयात जाऊनही प्रचार केला. प्रियांका गांधी वाड्रा या नागपूर मध्यमध्ये प्रचारासाठी आल्या असता त्यांना घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली होती. प्रचारात आघाडी घेऊनही केवळ काँग्रेस संघटनेच्या उदासीनतेमुळे आपला पराभव झाला असल्याचे बंटी शेळके यांनी म्हटले आहे.