राज्यात सध्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन संघर्ष सुरु असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केल्याची माहिती मिळत आहे. मात्र ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी मात्र ‘एबीपी माझा’शी बोलताना हे वृत्त फेटाळलं आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.

वृत्त काय आहे?

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद झाल्याची माहिती मिळत आहे. आयागोसमोर आपली बाजू भक्कपणे मांडण्यासाठी ठाकरे गटाने तब्बल दोन ट्रक भरून ११ लाख प्रतिज्ञापत्रं जमा केली होती.

Shinde vs Thackeray: ठाकरे गटाला मोठा धक्का, निवडणूक आयोगाकडून अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद

ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट चुकीचा असल्याने ती बाद ठरवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्येच ही प्रतिज्ञापत्रं देणं अपेक्षित होतं. नियम पाळण्यात न आल्यानेच ही प्रतिज्ञापत्रं नाकारण्यात आली आहेत. दरम्यान उर्वरित साडे आठ लाख प्रतिज्ञापत्रं स्वीकारण्यात आल्याचं समजत आहे.

फडणवीसांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांना नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं. “निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारचं कोणतंही प्रतिज्ञापत्र लागत नाही. एखाद्या पक्षाला मान्यता देणं किंवा चिन्ह देणं याचे नियम ठरलेले आहेत. गेल्या २० वर्षांत वेगवेगळ्या आयुक्तांनी त्यासंदर्भात दिलेले निर्णय प्रमाण आहेत. त्यामुळे कुणाचे प्रतिज्ञापत्र किती आहेत, कुणाचे रद्द झालेत, कुणाचे टिकले हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी चाललं आहे,” असं फडणवीसांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमच्याकडे कोणतीही माहिती नाही – वकील

निवडणूक आयोगाने आपल्याला यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नसल्याचं ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं आहे. ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी आपण आयोगाने दिलेल्या फॉरमॅटनुसारच प्रतिज्ञापत्रं दिली असून, हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.