भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावं अशी मागणी पडळकरांनी पत्रातून केली आहे. नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा असंही पडळकर पत्रात म्हणाले आहेत. पडळकरांनी यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत सभा घेतल्याबद्दल शरद पवारांवर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“नुकत्याच पार पडलेल्या चौंडी, अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा-नातवाच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॉम्बब्लास्टचा सूत्रधार दाऊन इब्राहिमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाचा लाँच करण्याचा इव्हेंट वाटतो,” अशी टीका पडळकरांनी केली आहे.

मंत्रिपदी असताना शरद पवार चौंडीत आले नाहीत, आताच आठवण का?; गोपीचंद पडळकर यांचा सवाल, जनजागृती यात्रेचा समारोप

“हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा हिंदुस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती त्यावेळेस हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या हिंदुसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला,” असं पडळकर म्हणाले आहेत.

“तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे,” अशी मागणी यावेळी पडळकरांनी केली आहे.

“आपण कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुघलशाही ही होळकरशाहीचा? अहिल्यानगर नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल ही अपेक्षा. अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय हे लक्षात ठेवा,” असा इशाराही गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp gopichand padalkar letter to maharashtra cm uddhav thackeray demands rename ahmednagar as ahilyanagar sgy
First published on: 02-06-2022 at 11:45 IST