मुलुंडमधल्या साडेसातर हजार घरांच्या पीईपी घोटाळ्यावरुन भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि इकबाल चहल यांच्यावर आरोप केले आहेत. मुलुंडचा मुंब्रा व्हावा असा कट या दोघांनी (उद्धव ठाकरे आणि इकबाल चहल) आखला असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. मानखुर्द, गोवंडी, बेहराम पाडा या ठिकाणी जे विस्थापित असतील त्या सगळ्या मुस्लिमांना पीईपीमधून घरं देऊन मुलुंडचं सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व नष्ट करण्याचा घाट उद्धव ठाकरे आणि इकबाल चहल यांनी घातल्याचंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत किरीट सोमय्या?

“उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिका यांची पहिली यादी आमच्या हातात आली. २७२ परिवारांना मुलुंड पूर्वमध्ये हलवण्यात येणार आहे. फिरोज अहमद, फिरोज शेख, फैजल हक, दुबेर सत्तार, फद्रू रहमान, जावेद सिद्दीकी अशी २७२ कुटुंबं स्थलांतरित केली जाणार आहेत. मालाडमधल्या नाल्याचं रुंदीकरण होत असल्याने तिथल्या ७२ कुटुंबाना स्थलांतरीत केलं जाणार आहे. फिरोझ नईम, मोहम्मद रिझवी, मोहम्मद हनीफ खान असे सगळे ७२ परिवार स्थलांतरित होणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे सगळेजण पाच ते दहा वर्षांपूर्वीच्या कच्च्या झोपड्यांमध्ये आलेले लोक आहेत. मुंबई महापालिकेने ११९ फूट, ९३ फूट, ९५ फूट, ७८ फूट अशी यांच्या झोपड्यांची नोंद केली आहे. या लोकांना ३०० स्क्वेअरफूट कारपेट असलेली घरं दिली जाणार आहेत. 54 लाखांचं घर आहे. अशी सात हजार कुटुंब बेहराम पाडा, चेंबूर, बैंगनवाडी, मालाड या ठिकाणाहून वास्तव्यास येणार आहेत. मुलुंडचं सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक महत्त्व कमी केलं जातं आहे. “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुलुंडचं मुंब्रा करण्याचं उद्धव ठाकरे आणि इकबाल चहल यांचं कटकारस्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबावावं अशी विनंती मी करतो आहे. मी टप्प्याटप्प्याने याविषयीच्या याद्या प्रसिद्ध करणार आहे असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. या लोकांमध्ये बांगलादेशी लोकही आहेत.” असाही आरोप सोमय्यांनी केला. हा पीईपी घोटाळा आहे, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री काळात. वर्षभर ही बाब इकबाल चहल यांनी दडवून ठेवली होती. या जागेवर आधी कोव्हिड हॉस्पिटल उभं राहणार होतं. जेव्हा बांधकाम सुरु झालं तेव्हा आम्ही ही सगळी माहिती बाहेर काढली. त्यामुळेच मी हा विषय उचलला आहे असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.