Suresh Dhas : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलं. मात्र, या हत्येच्या घटनेतील एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला एसआयटीने ताब्यात घेतलं असून न्यायालयाने आता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली होती. आता याबाबत मुख्यमंत्री लवकरच उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याबाबत त्यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली. तसेच यावेळी सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेबाबत बोलताना आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला पैसे देत होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

सुरेश धस काय म्हणाले?

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी म्हटलं की, “बीडच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करायची असल्याची माहिती मला मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मला वाटतं की ते दिल्लीला जाण्यापूर्वी किंवा आल्यानंतर ते उज्ज्वल निकम यांची भेट घेतील”, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत धस काय म्हणाले?

“मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं आणि न घेणं हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीमधील अंतर्गत असलेल्या विषयांवर बोलणार नाही. मात्र, राष्ट्रवादी पक्षाचा कोणावर दबाव वाढला आहे का? की नाही? किंवा कोणावर दबाव नाहीच. याबाबत जो काही विचार करायचा तो पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावा. सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा. माझ्या सारख्या व्यक्तीने राष्ट्रवादीतील अंतर्गत गोष्टींवर काय बोलावं?”, असं सुरेश धस यांनी म्हटलं.

‘जर एखादी त्रुटी राहिली तर…’

“संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जर पोलिसांकडून एखादी जरी त्रुटी राहिली तर न्यायालयीन चौकशीत कोणतीही त्रुटी राहू शकत नाही. मग जे कोणी आका, बाका, चाचा, मामा हे या प्रकरणातील सर्व लोक आहेत, ज्यांनी-ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली त्या सर्वांची न्यायालयीन चौकशी होईल आणि आरोपींना फाशीची शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे. जो आका आहे, तो आका सोपा आका नाही. आका १७-१७ मोबाईल वापरत होता. त्यामुळे आका काहीही करू शकतो. तसेच आका काही ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला पैसे पाठवत होता”, असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड यांनी आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर माध्यमांशी बोलताना काही आरोप केले होते. तसेच वाल्मिक कराडवर मकोका चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, मंजिली कराड यांनी केलेल्या आरोपासंदर्भात आमदार सुरेश धस यांनी आपण काहीही बोलणार नसल्याचं म्हटलं आहे.