गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांसाठी आपल्या गावी गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि देवेंद्र फडणवीस अशा नेत्यांची नावं समोर येत आहेत. या सर्व तर्क-वितर्कांवर केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड यांनी सूचक भाष्य केलं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे केंद्रातील नेते ठरवतील, असं विधान भागवत कराड यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “…मग लोकांना मारझोड का करता?” बारसू रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्रातल्या मनातल्या मुख्यमंत्र्यांबाबत अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील किंवा देवेंद्र फडणवीस अशा नेत्यांची नावं घेतली जात आहेत. तुमच्या मते महाराष्ट्राच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? असं विचारलं असता भागवत कराड म्हणाले, “महाराष्ट्राच्या मनातल्या मुख्यमंत्र्याबद्दलच्या चर्चा प्रिंट आणि टेलिव्हिजन माध्यमांत सुरू आहेत. हे सगळं करत असताना खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास करणं गरजेचं आहे.”

हेही वाचा- “अजित पवार मुख्यमंत्री होणारच…”, थेट अमित शाहांचं नाव घेत राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“२०२४ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांपेक्षा महाराष्ट्राचा विकास करणारा मुख्यमंत्री पाहिजे, हे सर्व केंद्रातील नेते ठरवतील. केंद्रातील नेते जे काही ठरवतील त्याला महत्त्व आहे. केंद्राबरोबर राज्य चाललं पाहिजे आणि केंद्राबरोबर राज्याचा विकास झाला पाहिजे. त्यामुळे केंद्रातील नेते ठरवतील तोच मुख्यमंत्री होईल,” असं विधान भागवत कराड यांनी केलं.