Chandrashekhar Bawankule on Bogus voters increased in Maharashtra in 5 months ahead of Assembly Election : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी निवडणूक आयोग व केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दी इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांनी एक लेख लिहून मॅच फिक्सिंग, बोगस मतदान ते पुरावे लपवणे यासह पाच मुद्दे उपस्थित करत सरकारवर आरोप केले आहेत. त्यावर केंद्रातील तसेच महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचे महसूल मंत्री व भाजपा नेते चंद्रशेखर यांनी राहुल गांधी यांच्या पाचपैकी एका आरोपाला उत्तर दिलं आहे.
राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे की निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नोंदणीकृत मतदारांची संख्या ८ कोटी ९८ लाख इतकी होती, जी पाच वर्षांनंतर मे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ९ कोटी २९ लाख इतकी झाली. मात्र, केवळ पाच महिन्यांनंतर, म्हणजेच नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील नोंदणीकृत मतदारांची संख्या ९ कोटी ७० लाखांवर पोहोचली. म्हणजे पाच वर्षांत ३१ लाखांची वाढ, त्यानंतर केवळ पाच महिन्यांत ४१ लाख मतदारांची वाढ! ही वाढ अतिशय अविश्वसनीय होती.
राहुल गांधी यांच्या केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या संगन्मताने बोगस मतदारांनी मतदारयादी फुगवल्याच्या आरोपावर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी याबाबत एक्सवर या मायक्रोब्लॉगिंगल प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “राहुल गांधी म्हणतात महाराष्ट्रात ५ महिन्यांत ३९ लाख मतदारांची वाढ ‘संशयास्पद’ आहे. पण राहुलजी २००९ ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो.एप्रिल २००९ ला लोकसभा निवडणुकीत ७ कोटी २९ लाख ५४ हजार मतदार होते. तर ऑक्टोबर २००९ ला विधानसभा निवडणुकीत ७ कोटी ५९ लाख ६८ हजार मतदार झाले. तेव्हाही फक्त ५ महिन्यांत ३० लाख मतदार वाढले होते! तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती? तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? याचं उत्तर द्या”.
बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार : बावनकुळे
महसूल मंत्री बावनकुळे राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाले, २००४, २००९ ला जिंकलात तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत! आज पराभव झाला, महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणं सुरू झालं. राहुलजी आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं, आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने बहुमताने निवडून दिले. जनतेने आमच्यावर दाखविलेला हा विश्वास आहे. तो पुढील निवडणुकीतही असाच अभंग राहील. आपण वारंवार खोटे बोलून राज्यातील जनदेशाचा अपमान करीत आहात. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही”.