महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं सांगितलं जातं. परंतु, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील होते, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडेंच्या या वक्तव्यावरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. भिडेंच्या वक्तव्यामुळे शुक्रवारी (२८ जुलै) विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाजी भिडे हे भाजपाचं पिल्लू असल्याचं म्हटलं आहे. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, संभाजी भिंडे यांचं जे काही वादग्रस्त वक्तव्य असेल ते सरकार तपासून बघेल. संभांजी भिडेंचा आणि आमचा संबंध नाही. संभाजी भिडे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते आमच्या पक्षाचे कार्यकर्ते थोडी आहेत. त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं असेल तर ते सरकार तपासेल. त्यावर सरकारला वाटेल तो निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा विषय आज विधानसभेत मांडला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांना कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे. भिडे हे अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत.” यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, “पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन राज्य सरकारने उचित कारवाई करावी.”

हे ही वाचा >> विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार? शरद पवारांबरोबरच्या बैठकीनंतर नाना पटोले म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संभाजी भिडे ही एक विकृती आहे : बाळासाहेब थोरात

दुसऱ्या बाजूला, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीदेखील संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. थोरात म्हणाले, “संभाजी भिडे ही एक विकृती आहे. त्यांनी महात्मा गांधींबद्दल अत्यंत अवमानकारण वक्तव्य केलं आहे, जे देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारं आहे. संभाजी भिडे वारंवार अशी वादग्रस्त वक्तव्ये करत असतात. त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा शोध घेणं आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक वातावरण अस्थिर करण्याचा आहे, हे सरकारने ओळखलं पाहिजे.”