भाजपा आणि शिंदे गटाकडून सातत्याने ठाकरे सरकारने सणांवर निर्बंध लादल्याचा आणि शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध काढल्याचा आरोप होत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी ‘हिंदूंचा सण निर्बंधमुक्त’ अशी बॅनरबाजीही झाली. यावरून भाजपा-शिंदे गट आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध झालं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार छगन भुजबळ यांनी या मुद्द्यांवरून “नवीन व्याख्येप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता नाही,” असं म्हणत शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे. ते शुक्रवारी (९ सप्टेंबर) मुंबईत एबीपी माझाशी बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, “गणपती बाप्पांनी सत्तेत असणाऱ्यांना सुबुद्धी द्यावी. सरकारने घोषणांच्या पलिकडे जाऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन लोकांचे प्रश्न सोडवावेत. नवीन व्याख्येप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता नाही. हे नवं सरकारच विघ्नहर्ता आहे अशी त्यांनी जाहिरात केली आहे. ते म्हणतात त्यांचं सरकार आलं आणि हिंदू सणांवरील विघ्न कमी झालं. त्यामुळे या विघ्नहर्तापेक्षा तेच विघ्नहर्ता झाले आहेत.”

“सरकारने बेरोजगारी, महागाईसारखी विघ्नही दूर करावीत”

“आज राज्यात अनेक विघ्न आहेत. ही विघ्न या सरकारने दूर करावीत. बेरोजगारी, महागाई अशा अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. मुसळधार पाऊस पडतो आहे. हेही विघ्न या सरकारने दूर करावीत,” असा सल्लाही भुजबळांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

“भाजपाने बारामतीच्या नादाला लागू नये”

छगन भुजबळ म्हणाले, “भाजपाने बारामतीच्या नादाला लागू नये. हे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. वेळेची आणि उर्जेचा अपव्यय आहे. त्यांनी तेवढा वेळ आणि शक्ती दुसरीकडे कुठेतरी लावावी. भलत्यासलत्या ठिकाणी कुठं जात आहात.”

“तुमची उंची किती, त्यांची उंची किती?”

“तुमची उंची किती आहे, त्यांची उंची किती आहे काही तरी विचार करा. मग त्यावर डोकं आपटा,” असं म्हणत छगन भुजबळांनी भाजपावर टीका केली.

हेही वाचा : “काळी दाढी आणि पांढरी दाढी यातला फरक म्हणजे…”, मुख्यमंत्र्यांच्या दाढीवरून छगन भुजबळांची विधानसभेत टोलेबाजी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“”आता उत्सवांमध्येही प्रचाराचे नारळ फोडले जात आहे”

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईत १५० चा नारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणपती मंडळांना भेटीचा सपाटा लावला आहे. याबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “आता उत्सवांमध्येही प्रचाराचे नारळ फोडले जात आहेत. नक्की गणेशदर्शन सुरू आहे की निवडणुकीचा प्रचार सुरू आहे हे लोकांच्या लक्षात येत आहे.”