अजित पवार हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी निर्णय घेतला म्हणूनच मी मंत्रिमंडळात आलो. अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी आभारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही आभारी आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

मी माझा पक्ष सोडलेला नाही-छगन भुजबळ

आमचे किती मतभेद असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हा मी सोडलेला नव्हता. आगामी काळातही आमच्या पक्षाला चांगलं यश मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत. मंत्रिपदाची जबाबदारी दिली गेली आहे. खातं कुठलं? अजून काही जबाबदारी द्यायची असेल तर तो निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो असंही भुजबळ म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी मनोज जरांगेंबाबतही भाष्य केलं.

मनोज जरांगेंबाबत काय म्हणाले छगन भुजबळ?

“मनोज जरांगेने चुका नाही तर खिळे केले आहेत. महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा समाजाचं प्रचंड नुकसान केलं आहे. गावागावांमध्ये त्यामुळे मराठा समाजालाही निश्चितपणे त्रास झाला. मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून महाराष्ट्रात राहतो, पण ह्या जरांगेच्या कर्तृत्वामुळेच निश्चितपणे मराठा समाजालाच त्रास झाला आहे.” असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगेंनी काय म्हटलं होतं?

छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना सामोरे जावं लागेल, असा थेट इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला.

राजभवन या ठिकाणी छगन भुजबळांचा शपथविधी

राज्यातील महायुती सरकारमध्ये आणखी एका मंत्र्याचा समावेश झाला असून राजभवन येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी झालेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात छगन भुजबळ यांचं नाव वगळण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तर, भुजबळ यांनी देखील जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. मात्र, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता छगन भुजबळ यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.