सांगली : राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती व नगरपंचायतीच्या निवडणुका होतील, यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी तयारीत राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगलीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केले. तसेच महापुराचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याबाबतच्या कामाची निविदा प्रक्रिया येत्या १५ दिवसांत पूर्ण होणार असून, यानंतर सांगली, कोल्हापूरला महापुराचा धोकाच राहणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले नाही, याची कारणे ज्ञात आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्याने पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. साधारण जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीमध्ये सात दिवसांचे अंतर असते. यावेळी कार्यकर्त्यांनी विधानसभेप्रमाणेच यश संपादन केले पाहिजे. बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था भाजपकडेच असाव्यात. दुसऱ्या पक्षाच्या ताब्यात या संस्था गेल्या तर गडबड होण्याची शक्यता निर्माण होते. आता सरकारही आपले आहे. विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही.
महापुराचा धोका टाळण्यासाठी मी ७२ तासांचा मुख्यमंत्री झालो, त्यावेळी जागतिक बँकेशी करार केला असून, यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे सूत्रे गेल्याने हा प्रकल्प रखडला होता. आता गेल्या दोन वर्षांत याला गती देण्यात आली असून, येत्या १५ दिवसांत महापुराचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. महापुरात सुमारे १५० टीएमसी पाणी समुद्रात जाते. या पाण्याने महाराष्ट्राचा निम्मा दुष्काळ हटवला जाऊ शकतो. हे पाणी उजनी, सोलापूर आणि मराठवाड्याकडे वळविले जाईल. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील तलाव, दुष्काळी भागातील तलाव पुराच्या पाण्याने भरून घेण्याचे प्रयोजन या प्रकल्पात करण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर व सांगलीला महापुराचा धोकाच उरणार नाही.
सहा महिन्यांपूर्वी आपण मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. यानंतर १०० दिवसांचा कार्यक्रम घेऊन राज्यातील १२ हजार कार्यालये स्वच्छ करण्याचे काम केले. यानंतर आता १५० दिवसांचा दुसरा कार्यक्रम हाती घेतला असून, यामध्ये ई – गव्हर्नसला प्राधान्य देण्यात आले आहे. यातून शासकीय दिरंगाई दूर करण्याचे प्रयत्न केले जातील. व्हॉट्सॲपवर अर्ज केल्यानंतर आवश्यक शासकीय शुल्कही याद्वारे भरता येईल आणि उत्तरही व्हाट्सॲपवर मिळेल. यासाठी शासनाने मेटाशी करार केला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी खा. धनंजय महाडिक, आ. सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सत्यजित देशमुख, गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र महामंत्री मकरंद देशपांडे, पृथ्वीराज देशमुख, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहराचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदींसह पक्षाचे आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.