Devendra Fadnavis On Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं होतं. मुंबईच्या आझाद मैदानावरील या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले होते. आज आंदोलनाचा पाचवा दिवस होता. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं. जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाच्या हिताचा तोडगा मंत्रिमंडळ उपसमितीने काढला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मला अतिशय आनंद आहे की मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला. त्यामुळे जे उपोषण सुरू आहे, ते उपोषण आता संपलं आहे. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत आमची सुरूवातीपासून तयारी होती. मात्र, मनोज जरांगे पाटील यांची सरसकटची मागणी होती, त्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय पाहता सरसकटची मागणी पूर्ण करणं शक्य नव्हतं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“आपण वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. मंत्रिमंडळ उपसमितीच्याही ही गोष्ट लक्षात आणून दिली. आपल्या कायद्याप्रमाणे आरक्षण हे समुहाला नसतं तर आरक्षण हे व्यक्तीला असतं. तसेच त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं. त्यामुळे ते सरसकटची मागणी मान्य करता येणार नाही. त्यांनी देखील ती भूमिका समजून घेतली आणि त्यांनीही म्हटलं की सरसकट कायद्यात बसत नसेल तर सरसकट करू नका. त्यानंतर मग मंत्रिमंडळ उपसमितीने आज दिलेल्या निर्णयानुसार तोडगा काढला आणि त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या?

हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी, आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना नोकरी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मान्य, मराठ्यांच्या ५८ लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायतीत लावणार, वंशवळ समिती गठित करणे, सगेसोयऱ्यांची छाननी करण्याचा मुद्दा, मराठा-कुणबी एक असल्याचा जीआर दोन महिन्यांत काढण्यात येणार, सातारा, औंध गॅझेटबाबत १५ दिवसांत लागू करण्याचं आश्वासन अशा मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे.